पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात, मात्र पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणूकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पुढील ५ वर्षात करण्यात येईल.
मुंबई येथे आयोजित वेव्हज परिषदेमुळे क्रिएटर्स इकॉनॉमिमध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करताना आपल्या सांस्कृतिक विविधता कंटेन्ट क्रिएटर्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत. पर्यटकाला स्थानिक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिल्यास पर्यटक त्या त्या भागाकडे वळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर निसर्गाने समृद्ध असून पर्यटनाची अमर्याद क्षमता इथे आहे. मुनावळे येथे जलपर्यटनालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पर्यटकांना इथल्या निसर्गासोबत इथल्या कला, संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. इथल्या भूमीपुत्राला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या कुटुंबासोबत भूमातेची सेवा करण्याची संधी मिळेल. तीन दिवसात महोत्सवला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने लोकाभिमुख योजनांना चालना देण्यासोबत गड-किल्ले संवर्धनाला चालना देण्याचे कार्य केले. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी देखील प्रयत्न होत आहेत. भिलार येथे पुस्तकांचे गाव, मांघर येथे मधाचे गाव आहे. इथे सर्वोत्तम स्ट्रॉबेरी उत्पादन होते, वेण्णा लेकचे सौंदर्य आहे, लोकसंस्कृतीचे विविध रंग आहेत. हे सर्व एकाच ठिकाणी आणण्याचे काम महापर्यटन उत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. अत्यंत नेटके नियोजन आणि सुरक्षित पर्यटन यामुळे हा महापर्यटन उत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. महाबळेश्वरला नवे आणि सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकसित कारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. महापर्यटन उत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने महोत्सवाचा विस्तार करून पुढल्यावर्षी अधिक पर्यटक येतील याचा प्रयत्न व्हावा. पर्यटन क्षेत्रातील अभिनव कल्पना या महोत्सवात पाहायला मिळाल्या. परदेशातील पर्यटनाच्या उत्तम संकल्पनादेखील पर्यटन विभागाने स्वीकाराव्यात अशी सूचना त्यांनी केली.
प्रास्ताविकात पर्यटनमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महापर्यटन उत्सवाचा हा पहिलाच प्रयत्न होता. महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता राज्यातील प्रत्येक विभागात दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. या माध्यमातून त्या विभागातील पर्यटनस्थळे, वैशिष्ट्ये याचे ब्रँडिंग करण्यात येईल. पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मुनावळे येथील पर्यटन सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यात यश येईल. कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तीन दिवसाच्या महापर्यटन महोत्सवात ७५ हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्र, छायाचित्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, महाराष्ट्राचा बाज असलेले कार्निव्हल परेड, लेझर आणि ड्रोन शो, हेलिकॉप्टर राईड, किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, लेझर आणि ड्रोन शो, लोककला अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment