Tuesday, 4 October 2022

जरा विसावू या वळणावर

 *सत्तरीच्या वाटेवर...*


एकदा एका साठी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, साठी ओलांडल्यावर आणि सत्तरीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले म्हातारपण सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे...


१. आजवर मी माझ्या आईवडीलांवर, भा्वंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकार्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली, पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.

२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायच सोडून दिलंय. उलट आता मला असे वाटतंय की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 

४. आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचे आणि सल्ले देण्याचे बंद केलय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कालबाह्य झाल्या असाव्यात. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा मला माझी शांतता अधिक महत्वाची वाटते. 

६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निख्खळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलय.

८. ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिताय.

९. माझ वय कुरघोड्या करण्याचे राहीले नाही. एखाद्याला जाणून बुजून संकटात सोडून देवून गंमत बघण्याचे वय राहीले नाही.

१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावस वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत... आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा...

* ज्या व्यक्तीने माझ्यासाठी घरदार, बायको लेकरांना वेळ दिला नाही, त्या व्यक्तीला मी कसलंच सहकार्य करू शकलो नाही. हे ही आठवून मरताना पश्चात्ताप होत असलेली भावना मनात येते. * आज माझं उर्वरीत आयुष्य पैशे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. ** आज उतारवयात लक्षात आले की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.

खरच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना? 

*आत्ता या वयात कळले जीवन सुंदर आहे. पण सरळमार्गी जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi