Tuesday, 8 August 2023

नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी


- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. 7 : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य आणि साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.


            या बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य विभागाचे संचालक नितीन अंबावडेकर उपस्थित होते, तर राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुण्या आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीची कारणे व उपाययोजनांवर चर्चा झाली.


            आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत पुढे म्हणाले की, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला किंवा साथरोगांचे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत आहेत, अशा भागात साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रुम सोबत संलग्न असावी. वॉर रुमला साथरोग रुग्णांबाबत, फैलावाबाबत 24 तासांत माहिती द्यावी. जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती स्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकही करावे.


            साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा नियमितरित्या करण्याच्या सूचना करीत मंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, औषधांचा पुरवठा कुठेही बाधित होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा. त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मलेरिया रूग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. धूर फवारणी नियमित करावी. बांधकामांमुळे पाणी साचून किटकजन्य आजारांमधील वाढ लक्षात घेता, मुंबईत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेवून पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले. 


            अपर मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथरोगांच्याबाबत जनजागृतीवर भर देवून नागरिकांना याबाबत शिक्षित करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, पाणी नमुने तपासणी महत्वाचे आहे. दूषित पाणी नमुना आल्यास त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करावी. रक्त नमुन्यांचे संकलन वाढवावे. मलेरीया, डेंग्यू व चिकुनगुण्या रूग्णांची तपासणी वाढवावी. श्री. अंबावडेकर यांनी बैठकीत साथरोगांच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.   


000



जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते

 जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते


- राज्यपाल रमेश बैस


कृत्रिम प्रज्ञेच्या आगमनामुळे शिक्षणात आमूलाग्र बदल होणार


 


            मुंबई, दि. ७ : देश पारतंत्र्यात असताना अनेक अडचणींवर मात करीत देशात उद्योग साम्राज्य उभे करणारे, तसेच बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणारे उद्योगपती जमशेदजी टाटा हे आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 


            मुंबई विद्यापीठ तसेच विज्ञान भारती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा' या विषयावरील एका परिसंवादाचे उद्घाटन राज्यपाल श्री.बैस यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. ७ ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            परिसंवादाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, सीएसआयआरचे माजी संचालक तसेच विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरु प्रा. अजय भामरे तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.


            कृत्रिम प्रज्ञा व यंत्र शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अटळ आहे. लिखाण, वाचन व अंकगणित ही कौशल्ये मागे पडतील. या युगात टिकण्यासाठी प्रत्येकाला एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी लागतील तसेच सातत्याने नवनव्या गोष्टी शिकत राहावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले. 


            कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने शिक्षणात अनुरूप बदल करावे लागतील. तसेच कौशल्य शिक्षण व कौशल्य अद्ययावतीकरण करण्यासाठी योजना आखावी लागेल. शिक्षण संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे, असे सांगून देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी उत्पादन, सेवा व कृषी क्षेत्रात संशोधन, नवीनता व उद्यमशीलतेला चालना द्यावी लागेल असे राज्यपालांनी सांगितले.


जमशेदजी टाटा यांनी व्यापारापेक्षा उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले


- डॉ. अनिल काकोडकर


            उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी निव्वळ व्यापारी मानसिकता न ठेवता उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले. त्यामुळे नीतिमत्ता व मूल्यांवर आधारित एका प्रगत समाजाची निर्मिती झाली, असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले.  


            देश स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना देशाने जमशेदजी टाटा यांचा उद्यमशीलतेचा व सामाजिक दायित्वाचा वारसा स्मरणात ठेवावा व आर्थिक असमानता तसेच शहरी - ग्रामीण दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. आपण पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी प्रयत्न करुन देशाला पुढे नेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


            स्वातंत्र्यलढ्यात वैज्ञानिकांची भूमिका महत्वाची होती. त्यांचे कार्य व चरित्र समाजापुढे आणण्याचे कार्य विज्ञान भारती करीत आहे असे विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मांडे यांनी यावेळी सांगितले. स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा यांनी विज्ञानाला प्रोत्साहन दिले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. मांडे यांनी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'विद्यार्थी विज्ञान मंथन' परीक्षा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


००००


Ll

MU, Vijnana Bharati host Seminar on 'Jamsetji Tata:


Unsung Hero of Indian Freedom Struggle


Maharashtra Governor hails the contribution of Jamsetji Tata


 


             Mumbai 7 : Maharashtra Governor Ramesh Bais presided over a Seminar on 'Jamsetji Tata : The Unsung Hero of India's Freedom Struggle' at the Convocation Hall of University of Mumbai. The Seminar was organised by University of Mumbai and Vijnana Bharati in collaboration with the Ministry of Culture, Government of India on Mon (7 Aug).


            Former Chairman of Atomic Energy Commission Dr Anil Kakodkar, former Director General of CSIR and National President of Vijnana Bharati Dr Shekhar Mande, Vice Chancellor of University of Mumbai Dr Ravindra Kulkarni, Pro Vice Chancellor Prof Ajay Bhamre and others were present. Speaking on the occasion, the Governor Bais described Jamsetji Tata as the pioneering protagonist of 'Atma Nirbhar Bharat'. He paid rich tributes to Jamsetji Tata for laying the foundation stone of the Tata Group and helping create the Indian Institute of Science. Cautioning about the drastic changes brought by Artificial Intelligence and Machine learning, the Governor called for bringing suitable changes in the education system to sync with the AI regime.


            Dr Anil Kakodkar said Jamsetji Tata had the vision and courage to engage in entrepreneurship as distinct from trade. He said Tata's emphasis on entrepreneurship helped to create an evolved society.


            Dr Shekhar Mande said Swami Vivekananda and Jamsetji Tata encouraged the learning of science in the country. He spoke about the work being done by Vijana Bharati to bring to the fore the work of unsung science leaders from the country. Dr Mande read out the message of good wishes sent by Ratan Tata. The Governor released the brochure of 'Vidyarthi Vidya Manthan' examination.


000



 

Monday, 7 August 2023

जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन


           


            पुणे, दि. 7 : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण ३४९ कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील १०९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच जेजुरी देव संस्थानचे विश्वस्त पोपटराव खोमणे, अॅड.पांडुरंग थोरवे, अॅड.विश्वास पानसे, अनिल सौंदडे, मंगेश घोणे, राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते.


            श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.


श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची वैशिष्ट्ये


            एकूण ३४९ कोटी रुपये खर्चाच्या श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तीन टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे.


            पहिल्या टप्प्यात जेजुरी गडाच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ दीपमाळांचे जतन व दुरुस्ती, १ हजार ३११ पायऱ्या आणि १५ कमानींची जतन व दुरुस्ती, कडे पठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर ८ मंदिरे व कमान, ओवऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.


            त्याचबरोबर जेजुरी शहरातील लवथळेश्वर, मल्हार गौतमेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरे, प्राचीन जलव्यवस्थापन होळकर व पेशवे तलाव, जननी तीर्थ व इतर कुंडे, बारवांची जतन व दुरुस्ती, कडे पठारावर जाणाऱ्या मार्गावरील जुन्या वास्तूंचे जतन, मार्गावरील पायऱ्या व मार्गाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. परिसर नियोजनाची कामेसुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहेत. याबरोबरच पायाभूत व्यवस्था, परिसर व्यवस्थापन व पर्यटक सुविधा, सुशोभीकरण यासाठी सुमारे १०९ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च करण्या

त येणार आहेत.


०००


शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांना मिळाला आनंद आणि सन्मानही

 ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांना मिळाला आनंद आणि सन्मानही

पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ


नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            पुणे, दि. ७: लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


            जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद दिसत होता. राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेला.


             कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.


            ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.


जनहिताचे आणि गतिमान निर्णय


            मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई देता यावी यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जनहिताची कामे करताना केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


             गेल्या वर्षभरात ३५ सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सहा ते सात लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. राज्याच्या विकासाला गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


            जेजुरी विकास आराखड्यामुळे परिसर सुशोभिकरणासोबत भाविकांसाठी सोयीसुविधांची निर्मिती होईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.


शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी १०९ कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील.


            'शासन आपल्या दारी' उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे नमूद करून ते म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शासनाकडे जाण्याची गरज नाही, आता ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.


महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न


            महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बचतगटांना फिरते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला सक्षम होतील. 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत कुटुंब लखपती होईल, अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. 


            गावापर्यंत समृद्धी देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सांडपाणी शुद्ध करण्यात येणार असल्याने ते पाणी उद्योगांना दिल्यावर सिंचनासाठी पाणी टंचाई भासणार नाही.


पुण्याच्या विमानतळासाठी सर्वांनी प्रयत्न करा


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी उद्योग, शेती अशा सर्वांनाचा नवीन विमानतळाचा फायदा होणार आहे. यामुळे मोठे निर्यात केंद्र येथे उभे राहू शकते. सर्वांच्या अडचणी दूर करुन विमानतळ देऊ शकल्यास पुण्याची पुढच्या २० वर्षाची प्रगती निश्चित होईल.


राज्याचा विकासासाठी शासन कटिबद्ध


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे, राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.


            राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.


            राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरविण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून गुंजवणी योजना मार्गी लावण्यात येईल. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.


            लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.


            मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली. या उपक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतल्याने राज्यात अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा प्रत्यक्षात लाभ होण्यासाठी गावपातळीवर यंत्रणा पोहोचली. सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी, पीएम किसान योजना, सातबारा संगणकीकरणात जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या रस्ते व मेट्रो प्रकल्पांनाही गती दिल्याचेही त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाला आमदार सर्वश्री दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनावणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.


शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ


            कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंसहायता समूहाला अनुदान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज परतावा योजना, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.


लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी


            ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरी पालखीतळ (ता. पुरंदर) येथे उपस्थित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्थाही आज करण्यात आली. उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बसेसची व्यवस्था केलेल्या लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी, बीएसएल, हिमोग्लोबीन, एसपीओटू आदी

 तपासणी करत आवश्यक त्यांना औषधोपचारही करण्यात आले.


0000



 


राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पुढील 24 तासांकरिता रेड अलर्ट,

 राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पुढील 24 तासांकरिता रेड अलर्ट,


ऑरेंज अलर्ट किंवा येलो ऑरेंज अलर्ट नाही

            मुंबई, दि. 7 : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही.


            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.


राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे-:


हातनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४६४ क्यूमेक्स विसर्ग


गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत २०५३.९८ क्यूमेक्स विसर्ग


भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.९३ क्यूमेक्स विसर्ग


दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग


दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आत्तापर्यंत ६८ क्यूमेक्स विसर्ग


राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत ८० क्यूमेक्स विसर्ग


ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग


बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग


निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्यूमेक्स विसर्ग


वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत ४५ क्यूमेक्स विसर्ग


सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग


चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३१ क्यूमेक्स विसर्ग


पानशेत (पुणे) (एकूण क्षमता ३०१.६१ दलघमी) आत्तापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग


            पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ४:५२ वाजता व दुपारी ४:३९ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.७ मीटर आणि दुपारी ३. ८ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.


            वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.


            नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.


            राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.


            आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:


फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL 


ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra


अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)


राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900


ईमेल: controlroom@maharashtra.gov.in


            राज्य शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ७ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.


*****

नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही,एसटी, खासगी बस प्रवाशांच्या सेवेत

 नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही,एसटी, खासगी बस प्रवाशांच्या सेवेत


- मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. 7 : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, मुंबईत ३०५२ बस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यापैकी १,३८१ बस बेस्टच्या असून त्या सुरू आहेत. खासगी कंपन्यांद्वारे उर्वरित १,६७१ बस (वेट लीजवर) कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येतात. जास्तीत जास्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्टकडून ९०० वाहनचालक दिले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहनने (एमएसआरटीसीने) १८० पेक्षा अधिक बस दिल्या आहेत. तसेच, २०० पेक्षा जास्त खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३०५२ बसपैकी २६५१ बस नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात सुरू असून, उर्वरित ४०० बस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.


            खासगी कंपन्यानी बस वाहन चालकांच्या किमान वेतनाची शाश्वती द्यावी, त्यांना आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, दिवाळी बोनस संदर्भातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


०००

मेरी माटी - मेरा देश” अभियानाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

 मेरी माटी - मेरा देश अभियानाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

लोकसहभागातून राज्यात हे अभियान यशस्वी करावे

- प्रधान सचिव विकास खारगे

            मुंबई, दि. 7 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी - मेरा देश’ अर्थात ‘माझी माती - माझा देश’ या अभियानाने होणार असून राज्यात लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या.

            राज्यातील सर्व जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत श्री. खारगे यांनी या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला व उपयुक्त सूचना दिल्या.

            देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी याचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व जास्तीत जास्त लोकसहभागातून हे अभियान उत्तमप्रकारे आयोजित करावे. पंच प्रण प्रतिज्ञावसुधा वंदनवीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गावपंचायतगटशहरनगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारणे हे उपक्रम आयोजित करावयाचे आहेत, असे श्री. खारगे यांनी सांगितले.

            9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, 'मेरी माटी - मेरा देशमोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. दिल्लीत 'अमृत वाटिकातयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्राकाढण्यात येणार असून ही 'अमृत वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारतया वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, अशी माहिती श्री. खारगे यांनी दिली.

             भारताला विकसित देश बनवणेगुलामगिरीची मानसिकता दूर करणेआपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणेएकता आणि बंधुता टिकवून ठेवणेनागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित प्रतिज्ञा घेणे व प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करणे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करावे, असेही श्री. खारगे म्हणाले.

             30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथनवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. संपूर्ण अभियानाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्याच्या तसेच अभियान प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना प्रधान सचिव श्री. खारगे यांनी दिल्या.

0000


 

Featured post

Lakshvedhi