कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या
‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
· रुग्णांची जगण्याची उमेद वाढवणाऱ्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सुधा मूर्ती यांचा गौरव
मुंबई दि. 7 : आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या “आशा” धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्र्यांनी काढले.
दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, परमाणू ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास, सहसचिव संजय कुमार, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, यांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते. खारघर येथे बांधण्यात आलेली ही १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, श्रीमती सुधा मूर्ती या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील “आई” आज आपल्याला पहायला मिळाली, सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं या स्थितीत श्रीमती मूर्ती यांची दातृत्वाची वृत्ती विरळी आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. जेंव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेंव्हा नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना देखील त्यांनी जपली.
सहकार्याचे अनमोल हात
आपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, सोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहातात, त्यांच्यासाठी हा ‘आशा’ निवास खुप महत्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.
अनुभवातून आलेला संदेश
श्रीमती सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतात, यात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि विचार आहे, हे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले.
आशा निवासामुळे गरीब रुग्णांना मदत – सुधा मूर्ती
नवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून श्रीमती मूर्ती यांनी टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले.इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले.
…
राज्यात आजपासून मिशन कवच कुंडल अभियान
दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट : सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. 7 : राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.
अभियानाबाबत माहिती देताना श्री. टोपे यांनी सांगितले की, राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत देशभरात १०० कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भरीव योगदान दिले जावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी महसूल, ग्राम विकास, महिला व बाल विकास, शिक्षण, नगर विकास अशा विविध विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. अभियानासाठी पुरेशा लस उपलब्ध आहेत. सध्या राज्याकडे ७५ लाख लस उपलब्ध आहेत. आणखी २५ लाख लस उपलब्ध होणार आहेत. सिरींज आदी अनुषंगिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
राज्यातील सव्वा नऊ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून आणखी सव्वातीन कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. अभियानाच्या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्देश आहे. सध्या पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ६५ टक्के तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण साधारणपणे टक्के आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला जाणार आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी एसडीआरएफ मधून सुमारे ७०० कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील. असे श्री. टोपे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment