Friday, 3 February 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

            नागपूर, दि. 3 : वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 10.30 वाजता नागपूर विमानतळ येथे विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे होते. नागपूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.


पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.


             मुख्यमंत्री शिंदे हे मंत्री दीपक केसरकर यांचे समवेत 11.50 वाजता नागपूर येथून हेलिकॉप्टरने वर्ध्याकडे रवाना झाले.

पुरस्कार प्राप्त

 सौ दोलांजली आशिष राजेशिर्के यांनी एस के स्टार इव्हेंटस कंपनी आयोजित मिससेस युनिव्हर्स इंडिया क्वीन ह्या स्पर्धेत नॉयडा दिल्ली येथे फिनाले मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून अनेक महिलांनी सहभाग घेतला त्यातील २५ महिलांचे या स्पर्धेसाठी निवड झाली.त्यातून 15 महिला फाईनलिस्ट झाल्या. पेण रायगड मधून सौ. दोलांजली राजेशिर्के यांनी .

 मिसेस युनिव्हर्स इंडिया क्वीन 2023 इलाईट किताब पटकावून पहिले बक्षिस मिळवण्याचा बहुमान मिळवला

 प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल पेणच्या प्रथम नागरिक मा. नगराध्यक्षा सौ. प्रितमताई ललित पाटील यांनी सौ.दोलांजली यांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


तरुणाई अशी हवी*

 🍁 *तरुणाई अशी हवी* 🍁


कर्नाटकातल्या अगुंबे घाटाच्या वाटेवर असलेलं सीतानदी नावाचं छोटंसं गांव. त्या वाटेवर असलेलं एक छोटंसं हॉटेल कम स्थानिक पदार्थ विकण्याचं दुकान श्रीसत्यनारायण नावाचं. मेनू अगदी मर्यादित, मोजकेच, अगदी घरगुती चवीचे पदार्थ, तेही तिथले खास स्थानिक, म्हणजे शहाळ्याची मलई आणि पाणी वापरून बनवलेला सायीसारखा मऊसूत, तलम नीरडोसा, फणसाच्या पानांच्या द्रोणात वाफवलेली खोट्टे इडली, गोडसर मंगळूर बन्स आणि गोल गोळे भज्जी, प्यायला चहा, कॉफी आणि खास लोकल मसाला घालून बनवलेला कषाय. दुकान चालवणारं शेणॉय आडनावाचं चौकोनी कुटुंब. गल्ल्याच्या मागच्या बाजूच्या स्वयंपाकघरात पदार्थ बनवणारे बाबा, गल्ल्यावर बसलेली आई, आलेल्या लोकांना पदार्थ सर्व करणारी अकरावी-बारावीतली मुलगी आणि दुकान सांभाळणारा आठवी-नववीतला चटपटीत, गोड, हसरा मुलगा. त्याची सेल्स पीच इतकी प्रभावी की मार्केटिंगच्या प्राध्यापकांनी त्याच्याकडून धडे घ्यावेत. 


आम्ही त्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो तेव्हा सकाळचे साडे-आठ वाजले होते. हॉटेलमध्ये त्या वेळी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. आई-वडील आणि बहीण त्यांच्या त्यांच्या कामात गुंग होते आणि मुलगा उत्साहाने आलेल्या लोकांना दुकानातले वेगवेगळे पदार्थ दाखवायचं, त्यांच्या किंमती सांगायचं काम करत होता, तेही अंगावर पडलंय म्हणून अनिच्छेने नव्हे तर मनापासून. 


काही लोक ऑर्डर देऊन पदार्थ टेबलावर येईपर्यंत दुकानात विक्रीला ठेवलेले पदार्थ बघत होते आणि त्यातला प्रत्येक गिऱ्हाईकाचा, त्याला कुठली भाषा समजते ह्याचा अंदाज घेऊन तो मुलगा, अद्वैत त्याचं नाव, त्या त्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत होता. इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मधूनच आई-वडिलांशी कोकणी असा त्याचा चार भाषांमधून सफाईदारपणे संवाद सुरु होता आणि तोही इतक्या लाघवीपणे की एक वस्तू बघायला आलेली व्यक्ती केवळ त्याच्या बोलण्याच्या हातोटीमुळे चार जिन्नस जास्त विकत घेत होती. 


माझ्या मैत्रिणीने तिथे विकायला ठेवलेली खोबरेल तेलाची बाटली बघितली आणि ती मला कोकणीत सहज म्हणाली, ‘घेऊ गो हे? कशे आसतले? बरे आसतले?’ म्हणजे ’मी हे घेऊ का ग, कसं असेल’? तर अद्वैतने लगेच तिला कोकणीत परस्पर उत्तर दिलं, ‘छान आहे हे तेल, अगदी प्यूअर, आम्ही पण हेच वापरतो, तुम्ही एकदा वापरून बघा’, आणि इतकंच म्हणुन तो थांबला नाही तर ’तुमका वास घेवका?’ असं म्हणून पटदिशी स्वयंपाकघरात जाऊन उघडी बाटली घेऊन आला तिला दाखवायला. माझ्या मैत्रिणीने तेल घेतलं. 


मी फक्त फणसाचे पापड बघायला मागितले तर ह्या मुलाने मला फणसाचे पापड, पोह्याचे पापड, उडदाचे तिखट पापड, उडदाचे कमी तिखट पापड, लसणाचे सांडगे, ताकातल्या मिरच्या, फणसाचे तळलेले गरे वगैरे दहा जिन्नस आणून दाखवले. बरोबर तोंडाची टकळी चालू, तीही मला कोकणी येतं हे कळल्यामुळे कोंकणीत. नव्वद रुपयाचे पापड घ्यायला गेलेली मी तब्बल नऊशे रुपयांची खरेदी करून परत टेबलवर परतले! 


बाजूलाच एक हिंदी भाषी कुटुंब लोणचं बघत होतं. त्यांना ह्याने लोणच्याचे आठ प्रकार दाखवले तेही हिंदीत बोलून, ’आप ये ट्राय करो, होम-मेड हैं’. त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारची लोणची घेतली. मला अद्वैतचं खूप कौतुक वाटलं. तसं मी त्याच्या आईला सांगितलं सुद्धा. ती हसली, म्हणाली, ‘लॉकडाऊन मध्ये शाळा आता बंद आहेत ना, तेव्हापासून सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास हाच करतो दुकान मॅनेज, तेसुद्धा स्वतःहून, हौसेने’. 


माझ्या ओळखीची कितितरी त्या वयातली शहरी मुलं सर्व सुविधा हाताशी असताना ’आय एम सो बोरड’ म्हणुन सतत आई-वडिलांच्या मागे भुणभुण लावताना मी बघितली आहेत, त्या पार्श्वभूमीवर मला अद्वैतचं वागणं, त्याची जबाबदारीची जाणीव, त्याचा उत्साही, सकारात्मक ऊर्जेने भरलेला दुकानातला वावर हे सगळंच खूप अपूर्वाईचं वाटलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांशी बोलता-बोलता, वेगवेगळ्या भाषा शिकता शिकता, मनुष्य स्वभाव जाणून घेऊन किती अनुभव संपन्न बनत होता तो. पुढे कसलेही शिक्षण घेताना हा अनुभव त्याला मोलाची साथ करेल. 


आजकाल जेव्हा मी पेपर मध्ये बातम्या वाचते की पबजी हा गेम खेळू दिला नाही म्हणून पंधरा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली किंवा शाळेत दिसण्यावरून कुणी काहीतरी बोललं म्हणून दहावीतली मुलगी डिप्रेशन मध्ये गेली वगैरे तेव्हा मला अद्वैत सारखी मुलं आठवतात. 


असाच अजुन एक तरुण मुलगा मी बरेचदा जिथे भाजी घेते त्या दुकानावर बसलेला असतो, त्याच्या आईला मदत करायला. साधेच पण स्वच्छ, नीटनेटके कपडे, नीट विंचरलेले केस, भुवयांच्या मधोमध शेंदराचा छोटा ठिपका आणि निर्मळ मोकळं हास्य असलेला तो मुलगा दुकानात गर्दी असेल तेव्हा भराभर गिऱ्हाइकांना भाजी वजन करून देत असतो आणि दुकानात कुणी नसताना पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत असलेला दिसतो. एक दिवस मी त्याला विचारलं, ‘कितवीत आहेस’? तर तो हसून म्हणाला ‘बारावी कॉमर्स, बाहेरून देतोय परीक्षा’. मी विचारलं, ‘पुढे काय करणार, कॉलेज?’ तर हसून म्हणाला. ’डिग्री करेन, पण बाहेरून’. मी विचारलं ’का रे’? तर पांढरेशुभ्र दांत दाखवत तो निर्मळ हसला आणि मला म्हणाला, ‘ताई, नुसतं बी कॉम करून मला काय मिळणार आहे? सांगा ना तुम्ही? कुठल्यातरी खासगी कंपनीत पाच -दहा हजारांची नोकरी? तशी तर आता सुद्धा ह्या दुकानातून मला महिना २५-३० हजारांची कमाई सहज होते. मी कॉमर्स शिकतोय कारण मला कम्प्युटर घेऊन दुकानाचा सगळा हिशेब ऑटोमेटेड करायचाय आणि पुढे-मागे लोन घेऊन मोठं भाजी आणि फळांचं दुकान उघडायचंय. पक्क्या इमारतीत. चांगल्या लोकेशनवर.’ 


त्याच्या आवाजातच नव्हे तर पूर्ण देहबोलीतच कमालीचा आत्मविश्वास होता. आपल्याला काय करायचंय आणि काय नाही ह्याची पूर्ण जाणीव होती. ’वय काय रे तुझं’? मी न राहवून विचारलं, ‘ह्या वर्षी १९ पूर्ण होतील’ तो म्हणाला. कितीतरी श्रीमंत घरातली ह्या वयातली मुलं पब, डिस्को, फोन गेम्स आणि महागडे मोबाईल ह्यातच गुंतून जाऊन अर्थहीन आयुष्य घालवत असताना ह्या मुलाचा आत्मविश्वास आणि त्याची जिद्द पाहून मी थक्कच झाले. 


तरुणाई अशी हवी. 


*©️ शेफाली वैद्य*

जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत,राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

 जय जय महाराष्ट्र माझा राज्याचे अधिकृत राज्यगीत,राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

           

            मुंबईदि. 2 (मावज) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाईसमाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक 'जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझाहे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

            संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्णस्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.

राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीहीराष्ट्रगीताचा मानसन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थासर्व प्रकारच्या अशासकीय संस्थास्वयंसेवी संस्थाखाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिकसामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालकेगरोदर स्त्रियाआजारी व्यक्तीदिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालयेशासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापनास्थानिक स्वराज्य संस्थाविद्यापीठेशाळामहाविद्यालयेशैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रमस्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

            कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-

 

जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥

काळ्या छातीवरी कोरलीअभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळतीखेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितोमहाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझागर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥

स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

 स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण.

            मुंबई, दि. २ : आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता 'फिंगर बोल'मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.


            दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दंतवैद्यकांना 'एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री' पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 'मेडियुष' या दंतवैद्यकांच्या संघटनेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.


            यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.


            'स्वच्छ मुख अभियान' हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे. वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.  


            कार्यक्रमाला 'मेडीयुष'चे सह-संस्थापक डॉ गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे, 'ओरल हेल्थ मिशन'चे डॉ दर्शन दक्षिणदास, डॉ विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ डॉ संदेश मयेकर, कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल, तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.


००००

Maharashtra Governor presents 'Excellence in Dentistry Awards'.

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Excellence in Dentristry' awards to dentists from across the State at Raj Bhavan Mumbai. The programme was organised by 'Mediyush', an organisation of dentists. 


      The Governor also unveiled the Logo and Tagline of Government of Maharashtra's 'Swachch Mukh Abhiyan'.


      Observing that the modern practice of rinsing hands in a finger bowl after lunch or dinner was harmful for dental care, the Governor called upon dentists to create awareness to stop the practice.


       Co Founder of Mediyush Dr Govind Bhatane, Joint Director of Medical Education Dr Vivek Pakhmode, Indian Dental Association's Dr Ashok Dhobale, Aesthetic and Cosmetic Dental specialist Dr Sandesh Mayekar, Dr Darshan Dakshindas, Director of Kalika Steel Govind Goyal, Dr Vishwesh Thakre and doctors and specialists from Dentistry were present.

मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

 मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे.

            मुंबई, दि. 2 : बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स 22.50 हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.


            सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, एकूण क्षेत्रापैकी ४.५० हेक्टर क्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स व उर्वरित १८.०० हेक्टर क्षेत्रावर सीट्रस इस्टेट इसारवाडी होणार असून, ४३ कोटी ७९ लाख, सात हजार सातशे रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


             सीट्रस इस्टेट अंतर्गत क्षेत्रात रंपूर लाइम, न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले - मोसंबी ही मातृवृक्ष असणार आहेत.


            या सेंटरची मोसंबी फळ पिकाची जातीवंत, रोग व कीडमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करणे, मोसंबीच्या दर्जेदार उत्पादन व शास्त्रोक्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक देणे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, मोसंबी पिकाच्या व्यवस्थापन, फळ प्रक्रिया, ग्रेंडिंग, पॅकेजिंग, साठवण, मार्केटिंग व निर्यातीला चालना देणे, इंडो - इस्राईल तंत्रज्ञानाने उत्पादकता वाढविणे, मृद व पाणी परीक्षण, ऊती व पाने पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा तसेच निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा देणे ही या सीट्रस इस्टेटची उद्दीष्टे आहेत.


            या सीट्रस इस्टेटमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, प्रात्यक्षिके, माती, पाणी, ऊती, व पाने पृथक्करण प्रयोगशाळा, निविष्ठा विक्री केंद्र, ग्रेडिंग, पॅकिंग, साठवण व कोल्ड स्टोरेज, औजारे बँक, फलोत्पादन तज्ज्ञ, वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ, कीटकशास्त्र तज्ज्ञ, माती परीक्षण तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्या सेवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधा या सीट्रस इस्टेटमार्फत दिल्या जाणार आहेत.


            तसेच, सेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) अंतर्गत इंडो इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये कलम काडीच्या आठ जातीची एकूण 154 झाडे, तर मूलकांडच्या तीन जातीची एकूण 80 झाडे असतील. ४.५० हेक्टरवर असलेल्या या सेंटरचा एकूण खर्च १२ कोटी ८३ लाख ५४ हजार एवढा असणार आहे. निर्यातक्षम फळ बागांची वाढ करणे, प्रति हेक्टर ३० टनापर्यंत उत्पादकता वाढविणे, गुणवत्तापूर्वक रोपांची निर्मिती करणे, आदर्श रोपवाटिकांची स्थापना करणे, काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, यांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे ही या सेंटरची ध्येय आहेत.


            याशिवाय रोग व्यवस्थापन करणे, विविध वाणांची शिफारस करून उत्पादनात वाढ करणे, निर्यातयोग्य वाणांचा विकास करणे, पॅकिंग, प्रक्रिया यासारख्या काढणीत्तोर व्यवस्थापनावर भर देणे, कोल्ड स्टोरेजची उभारणी करून साठवण क्षमता वाढविणे, भौतिक व रासायनिक गुणधर्म योग्य असलेली जमिनीची निवड, कीड व रोग यांचे एकात्म‍िक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दीष्टे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा 'मैत्री' कायदा

 औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा 'मैत्री' कायदा

- उद्योगमंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्याने उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

            काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली आहे. या विधेयकामध्ये उद्योगांसाठीच्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान करणे, त्याबाबत यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याच्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री) विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे.


            गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या / मंजुरी आणि सेवा कालमर्यादेत देण्याच्या दृष्टिने कायद्याद्वारे गुंतवणूकदार सुविधा केंद्र/ गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी म्हणून एक खिडकी प्रणालीला अधिकार देण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 आणला जाणार आहे.

प्रस्तावित मैत्री कायदा

            उद्योग स्थापन करताना आणि तदनंतर आवश्यक परवानग्या व मंजुरी देणे, गतिमान व पारदर्शी पद्धतीने देण्यासाठी कायद्यांतर्गत ऑनलाईन एकल खिडकी प्रणाली तयार करणे, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविणे व त्यासाठी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल विकसित करणे, राज्यातील तक्रार निवारण यंत्रणेसह व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी एक परिसंस्था विकसित करणे, तसेच सर्व संबंधित विभागांसोबत समन्वय ठेवून उद्योगांसाठी विहित कालावधीत सेवा मिळवून देणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

मैत्री कायद्यातील तरतुदी

            अधिकार प्रदत्त समिती विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला नियम, मार्गदर्शक तत्वे व कार्यपद्धती तयार करणे तसेच विहित कालमर्यादेचे उल्लंघन झालेल्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार राहतील. ज्या अधिकाऱ्यांनी वेळेत परवानगी दिलेली नाही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याचे अधिकार समितीला राहतील.


             निकाली अर्ज काढणे- सक्षम प्राधिकाऱ्याने विहित कालावधीत अर्जाचा निपटारा न केल्यास त्या अर्जावर अधिकार प्रदत्त समिती निर्णय घेईल.


            पर्यवेक्षकीय समिती- प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती धोरणात्मक शिफारशींसह विलंब झालेल्या प्रकरणामध्ये शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यास सक्षम राहील.


            एक अर्ज नमुना (Common application form)- उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता आवश्यक परवानगीसाठी लागणारे एकत्रित अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


तपासणीचे सुसूत्रीकरण- विभाग प्रत्येक युनिटची तपासणी न करता यादृच्छिक (Randomly) निवडीच्या आधारे संयुक्त तपासणी करू शकतील. जेणेकरुन उद्योगांना होणारा त्रास कमी होईल.


            ऑनलाइन प्रणाली रचना- गुंतवणुकदारांना मिळणाऱ्या परवाना सुविधा व माहिती मिळण्यासाठी मदत देणे, औद्योगिक, व्यावसायिक किंवा व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी ऑनलाईन प्रणालीवर उद्योगांना मिळणाऱ्या सेवा वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील.


मैत्री कायद्याचे अपेक्षित परिणाम


• गुंतवणुकदारांना एका ठिकाणी व जलद पद्धतीने सर्व परवानग्या मिळणे शक्य होईल.


देशांतर्गत व विदेशी गुंतवणूकीसाठी राज्य पसंतीचे ठिकाण बनेल.

• राज्यामध्ये रोजगार निर्मिती होईल.

• एक खिडकी प्रणालीमार्फत सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाल्यामुळे उद्योग उभा करण्यासाठी व तो चालविण्यासाठी येणारा खर्च (Cost of Doing Business) कमी होईल. त्यामुळे राज्यातील उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल.


• मैत्री कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योगमंत्री व मुख्यमंत्री यांच्या स्तरावर आढावा घेतील.


****

Featured post

Lakshvedhi