Friday, 6 January 2023

महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटनमहिलां

 महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटनमहिलांनो स्वयंस्फूर्तीने घ्या विज्ञानक्षेत्रात भरारी.

- डॉ.निशा मेंदिरत्ता

            नागपूर, दि. 5 : विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या,असे आवाहन वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता यांनी आज महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी केले.


           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आज महिला विज्ञान काँग्रेसचा उद्घाटन सोहळा झाला.


            वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता, पद्मश्री राहीबाई पोपेरे,भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना, महासचिव डॉ.एस.रामकृष्ण, उद्योजिका कांचन गडकरी, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.


         डॉ.निशा मेंदिरत्ता म्हणाल्या, कुटुंब,समाजाबरोबरच देशविकासात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. वर्तमानस्थितीत शिक्षणात मुली आपली योग्यता सिद्ध करीत आहेत. महिलांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण व दृष्टीकोन तयार होत आहे. विज्ञानक्षेत्रातही महिलांना प्रोत्साहनाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत महिलांचे योगदान 18 टक्के असून हे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. महिलांनी स्वयंस्फूर्तीने विज्ञानाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.


          डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितले की, अदिती, अरुंधती, लोपामुद्रा, गार्गी या विदुषींनी वेदरचनांमध्ये मोलाचे योगदान देत ज्ञान शाखा भक्कम केली. भारतीय महिलांचे हे गत वैभव विज्ञान क्षेत्रातही आणावे लागेल. त्यासाठी महिलांनी स्वत्वाची जाणीव व वैज्ञानिकदृष्टीचा अंगीकार करून या क्षेत्राला पुढे घेवून जाण्यात व पर्यायाने देश विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.


          पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी स्वानुभव कथन करत असंख्य अडचणींवर मात करून महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात असा आशावाद मांडला. दुर्गम भागातील वास्तव्य, शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असतांना 22 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयासातून निर्माण केलेली 153 वाणांच्या बियाण्यांची बँक हा प्रवास त्यांनी मांडला. घरोघरी बीजमाता राहीबाई निर्माण व्हाव्या आणि गावोगावी बियाण्यांच्या बँक तयार व्हाव्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.


          कांचन गडकरी यांनी मातृसत्तेचे व महिलांचे समाजाती महत्वाचे स्थान अधोरेखित करत, महिलांनी येणाऱ्या पिढ्यांकडे वैज्ञानिक दृष्टीकोन संक्रमित करण्याचे आवाहन केले. डॉ. कल्पना पांडे यांनी महिला विज्ञान काँग्रेसच्या मंचाहून महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व शाश्वत विकासातील सहभाग वाढेल, असा आशावाद मांडला. डॉ.एस.रामकृष्ण यांनी स्वागतपर भाषण केले.

विश्व मराठी संमेलन :मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा

 विश्व मराठी संमेलन :मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 5 : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, झी 24 तास या वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे, साम टीव्ही मराठीचे प्रसन्न जोशी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे संपादक अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते.


            यावेळी बोलतांना मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने जन्माला घातलेली विरासत ही जगातील दहा प्रमुख विरसतींपैकी एक आहे.विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वंदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी सांगितले.


             विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.


            या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या सह विविध देशातील मराठी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि उद्योग विभाग यांच्या सहकार्याने आयोजित विश्व मराठी संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे.

विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे

 विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक संपन्न.

             मुंबई, दि. 5 : विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, शैक्षणिक शुल्क समितीचे अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे व सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनासाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातून कार्य करावे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.


परीक्षा, निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करावे


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले,राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून दि. ३० जून पर्यंत निकाल जाहीर करावेत. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दि. १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे. विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे.त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल.


            विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नाही. अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्यावी.


            उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत: महिलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


               या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्य:स्थिती याबाबत सादरीकरण केले.


            नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. 


0000


काशीबाई थोरात/विसंअ/


 


Governor, Minister review preparedness of Universities for implementing NEP from coming Academic Year


"Vice Chancellors should lead the Universities from the front": Governor


"New Academic Sessions must start from 1 August": Chandrakant Patil


      Mumbai, 5th Jan : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari in his capacity as Chancellor of universities today reviewed the preparedness of traditional public universities for the implementation of the National Education Policy (NEP) 2020 from the academic session for 2022-2023. The meeting of vice chancellors chaired by him also discussed the issues of Uniform Academic Calendar and uniformity in time table of examinations and timely declaration of results as mandated by the Maharashtra Public Universities Act.


            The review meeting was attended by Minister of Higher and Technical Education Chandrakant Dada Patil, Principal Secretary Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi, Chairman of Fee Regulatory Authority Justice (retd) Vijay Achaliya, Chairman of Admission Regulatory Authority J P Dange, Director IIT Bombay Subhasis Chaudhuri and members of the Task Force for the implementation of NEP led by Chairman Dr Nitin Karmalkar. 


            The Governor said while it is important to conduct examinations, declare results and start new academic sessions as mandated by National Education Policy on time, it is also important for vice chancellors to lead the Universities from the front and shape the character of students. Referring to the vacancies of staff and faculty in universities, he said a way must be found to take the universities forward despite the existing constraints.


            Minister Chandrakant Dada Patil asked vice chancellors to conduct all examinations by 31st May, declare results by 30th June and conduct Entrance tests and admissions by 31th July so as to start the new academic session without delay from 1 August.


            Stating that the present enrollment in higher education is around 32 lakh, he asked universities to set their own targets for increasing the enrollment in a phased manner so as to attain the enrollment of 50 lakh students. The Minister also called for strengthening the National Service Scheme in colleges and universities by enhancing its ambit and outreach.


            The meeting discussed issues such as Development of Learning Management Software for all State Public Universities and use of e- Samarth, Development of Massive Open Online Course (MOOC) in Marathi, Uniformity in Credit equivalence in Universities and Changing of Duration of lectures from 48 minutes to 1 hours in line with the Credit System framework adopted in NEP 2020. The meeting also reviewed the progress of students registration under Academic Bank of Credit and uploading of Mark Sheets and Degree Certificates on DIGI-LOCKER, Traininig of officials and members of various authorities by MSFDA and recruitment of teaching posts in Non Agricultural Universities.


            A memorandum of understanding was signed between IIT Bombay and Government of Maharashtra for the translation of books and resources of Under Graduate and Post Graduate professional and non professional programmes in Marathi language as outlined in NEP 2020. The project 'Udaan' is led by IIT Professor Ganesh Ramakrishnan.


0000


मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित

 मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित

शिक्षणाला अनुरूप वातावरण


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पुणे, दि. 5 : नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर केवळ अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टींचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्व फुलविण्याचा विचार केला असून मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अशाप्रकारे अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण तयार केले आहे. उद्याची पिढी घडविण्यासाठी अशा शिक्षणाचा फायदा होईल आणि त्यातून देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


            न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुरलीधर लोहिया मातृमंदिर नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला क्रीडामंत्री गिरीश महाजन, संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डॉ.रवींद्र आचार्य, आशिष पुराणिक, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते.


            मोठा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री.फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक, आगरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या महापुरुषांनी या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था एका वटवृक्षाप्रमाणे विविध शाखांमध्ये बहरली असून ५० हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य करते आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला साजेसे मातृमंदिर सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता असलेल्या काळात स्थापन झालेल्या या संस्थेने देशात नवे शिक्षणाचे प्रयोग होत असताना आणि नवे धोरण अंमलात येते तेव्हा अग्रेसर राहून त्याचा अवलंब आपल्याकडे करावे हेच अपेक्षित होते आणि ते मातृमंदिरने केले असल्याचे सांगून श्री.फडणवीस यांनी शाळेचे अभिनंदन केले.


विद्यार्थ्यांना शाळा हवीशी वाटेल असे वायुमंडल अपेक्षित


            कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन हे सुंदर इमारतीच्या आधारे किंवा पायाभूत सुविधांच्या आधारे करता येत नाही, तर त्या शाळेची इमारत आपले बाहु उघडून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कवेत घ्यायला तयार आहे का यावर होते. विद्यार्थ्यांना तिथे जाण्याची इच्छा होईल असे वातावरण शिक्षक करतात का, तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भिती न वाटता तिथले वातावरण हवेहवेसे वाटेल असे वायुमंडल तिथे तयार होते काय या आधारावर शाळेचे मूल्यमापन होते. जुन्या काळात शिक्षणाची पद्धत कठोर होती.आज शिक्षणाची ओढ तयार व्हावी, विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे शिक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीतील गुणांची अभिव्यक्ती करता येईल असा विचार नव्या शैक्षणिक धोरणाने केला आहे. 


मातृभाषेला ज्ञानभाषा करायची आहे


            इंग्रजी जगात बोलली जाणारी मोठी भाषा असल्याने तिचा तिरस्कार करून चालणार नाही, मात्र मातृभाषेचा पुरस्कार करावा लागेल. जगात प्रगत राष्ट्रांच्या विकासात मातृभाषेचा वाटा आहे, त्यामुळे मातृभाषेचा विचार इंग्रजी शिक्षण घेताना करावाच लागेल. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतल्या शिक्षणाचा समावेश सर्व विषयात करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत घेता येणार आहे. आपली भाषा ज्ञानभाषा केल्याने आणि त्या भाषेत ज्ञान दिल्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणानुरूप विकसित होण्याची संधी मिळेल. ग्रामीण युवकांनाही स्वतःची प्रगती साधता येईल.


            शिक्षणाच्या माध्यमातून आपण नवभारत घडवत आहोत. विद्यार्थ्यांना विजयाचा इतिहास शिकवायला हवा. आपली उज्ज्वल संस्कृती आणि परंपरेचा स्वीकार करत आणि त्याचवेळी संविधानाने दिलेल्या मुल्यांची जोपासना करत आपल्याला पुढे जायचे आहे. संविधानाची मूल्ये रुजवली आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या बाबी शिक्षणात आणल्यास भारत विश्वगुरू पदापर्यंत पेाहचेल. असा पाया भरण्याचे कार्य मातृमंदिर संस्थेने केले असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. 


            यावेळी श्री.लोहिया यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. संस्थेची वाटचाल नव्या युगाला साजेशी असल्याचे ते म्हणाले.


            संस्थेचे विश्वस्त कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. शाळेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण आणि अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला जातो, असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुकूल नूतन इमारत असल्याचे ते म्हणाले.


            नूतन इमारत उभी करण्यात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


००००


 

भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न

 भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बालेवाडी येथे पहिले क्रीडा विद्यापीठ.

            पुणे, (विमाका) दि. ५ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन यापुढेही महाराष्ट्रातच करण्यात येईल. या स्पर्धेस पुढील पाच वर्षे राज्य शासनाचे आर्थिक सहकार्य असेल आणि भविष्यात एटीपी ५०० स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.


            यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रविण दराडे ,स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर तसेच खेळाडू उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, खेळाच्या विकासाप्रती शासनाची कटिबद्धता आहे. राज्यातील पुण्यासह ९ शहरात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याने सर्वाधिक पदके मिळवली आहेत. शासन प्रत्येक शहरात खेळासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            येत्या काळात राज्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आज खेळ सुनियोजित पद्धतीने खेळला जात असल्याने त्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक, शारीरिक क्षमतेची गरज आहे. यादृष्टीने आवश्यक वातावरण आणि सुविधा खेळाडूंसाठी निर्माण करण्यात येत आहेत. बालेवाडी येथे पहिले क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यातून खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            टाटा ओपन स्पर्धेचे हे पाचवे पर्व असून गेली चार वर्षे या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० टेनिस स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्यावतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.


            क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन


खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आनि  प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील

– मुख्यमंत्री

            पुणे, दि. 5 : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून राज्याचा नावलौकीक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या बक्षीसाच्या रकमेत ५ पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल, राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.


जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा


            राज्यात तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.


स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा


            ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्व देतो. १० हजारपेक्षा अधिक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.


            गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर आपले खेळाडूदेखील गुणवंत आहेत. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली. राज्यातही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून शासनाने खेळाडूंना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. जीवनात खेळ महत्वाचा आहे, त्यापेक्षाही खिलाडूवृत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकण्याची जिद्द तयार होते. पराजयातून उभे राहून जिंकण्याची जिद्द मनामध्ये खेळाच्या माध्यमातून निर्माण होते.


            राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. निरज चोप्रासारखा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक मिळवतो आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर राष्ट्रगीत वाजताना भारताचा तिरंगा वरवर जातो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा गौरव वाटतो, तोच देशाचा गौरव असतो. हेच खरे खेळाडूला मिळालेले पदक असते. सहभागी खेळाडू असे पदक देशाला मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            मेहनतीने खेळा, ताकदीने खेळा, पूर्ण जोर लावून खेळा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या खेळाडूंनी पदक मिळविण्याच्या जिद्दीने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यांना कोणी थांबवू शकणार नाही, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


            ‘बाज की असली उडान अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी नापी है मुठ्ठीभर जमीं हमने, अभी तो पुरा आसमान बाकी है,' अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.


दर दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन - गिरीश महाजन


            क्रीडा मंत्री श्री.महाजन म्हणाले, जोपर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ खेळला जात नाही तोपर्यंत पदके प्राप्त करता येणार नाही. त्यासोबत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आधुनिक खेळ हा कौशल्य आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच हे कौशल्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत भरीव वाढ केली आहे. खेळाडूंना प्रथमच राष्ट्रीय स्पर्धांसाठी विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासनाकडून खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला राष्ट्रकूल स्पर्धेत आठ पदके मिळाली. देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत स्वत: संवाद साधला हे प्रथमच घडले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


            महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच ही राज्यस्तरीय मोठी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्य शासन तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा संघटनांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, क्रीडापटुंच्या कामगिरीवर क्रीडा चळवळ पुढे जात असते. राज्यातील ९ शहरात ही स्पर्धा आयोजित केल्याने संपूर्ण राज्यात खेळाची वातावरण निर्मिती झाली आहे. खेळात हार-जीत, जय पराजय होणारच. परंतु सर्वोच्च क्षमता पणाला लावून खेळाडूंनी कामगिरी करावी. खेळ भावनेने रसिकांची मने जिंकावित. चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घावी, विजयाने माजू नये, पराभवातून खचू नये. क्रीडासंस्कृती वाढवणे, रुजवणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. राज्यात प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर निरोगी करत नाहीत तर समाजमन निकोप करण्यासाठी उपयुक्त होतात. देशी खेळांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असेही श्री. पवार म्हणाले.


             प्रास्ताविकात श्री.दिवसे यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात २३ वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर ३९ खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून त्यापैकी ७ खेळांचा प्रथमच समावेश होत आहे. राज्यातील ८ जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. क्रीडा मंत्री श्री.महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याने ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल राज्याला प्राप्त झालेला चषक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. शेवटी तो मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रीडा आयुक्तांकडे सुपूर्द केला. राज्याच्या ३६ जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचे प्रातिनिधिक संचलन यावेळी करण्यात आले. यावेळी रिदमिक जिम्नॅसिटकच्या खेळाडूंनी शानदार प्रात्यक्षिके सादर केली. खेळाडूंना खेळाची शपथ देण्यात आली. प्रारंभी कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मल्लखांब खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली तसेच चित्ताकर्षक इलुमिनाती कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आहे.


000


 

 



सुप्रभा







 

Featured post

Lakshvedhi