अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान
साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन.
मुंबई, दि. 5 : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून दि. ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या व राज्यात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करू शकतील. साहित्यबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विज्ञान, क्रीडा, कृषि, आरोग्य, पर्यावरण व अध्यात्मिक. यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांना अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही.
विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "नवीन संदेश या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान या शीर्षाखाली 'what's new' या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi Sahitya Sammelane' या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर 'नवीनतम संदेश' या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान' शीर्षाखाली उपलब्ध होतील, तसेच सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दूसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५२२२४३२ ५९३१) येथे विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.
अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (दि.०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक (२०२२ ते ०६ जून २०२२) येणाऱ्या अर्जांचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी कळविले आहे.
**
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रकार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये 120 प्रशिक्षणार्थीकरिता निवासासह प्रशिक्षणार्थी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
या प्रशिक्षण केंद्रात आदर्शगाव योजनेतील प्रशिक्षणाबरोबरच इतरही प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण केंद्र संचलित करण्यासाठी आस्थापना निर्माण करणे, निधीचा स्त्रोत निश्चित करणे, देखभालीचे धोरण ठरविणे, अल्प व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करणे तसेच प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हे अध्यक्ष असतील. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव/उपसचिव तसेच अवरसचिव या अभ्यासगटात सदस्य असतील. याशिवाय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कन्सल्टंटस संचालक, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदाचे प्राध्यापक आनंद पुसावळे, कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रफिक नाईकवाडी, सेवानिवृत्त कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी प्रतापराव चिपळूणकर, बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे देखील या समितीचे सदस्य असतील. याशिवाय, आदर्शगाव योजना-प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेचे 1 प्रतिनिधी, 1 पंचायत राज प्रतिनिधी,1 सरपंच हे या समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील तसेच मृद संधारण व पाक्षेव्यचे संचालक हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.
००००