Saturday, 20 April 2019

रेश्मी पुरणपोळी


रेश्मी पुरणपोळी
साहित्य- २० पुरणपोळयासाठी चे साहित्य
        १ किलो चणाडाळ, अर्धा ते पाऊण किलो गुळ (गोडीनुसार ), अर्धा किलो मैदा.
         वेलची व जायफळ पावडर, साजूक तूप
कृती : -
प्रथम डाळ धुवून मऊशीर शिजवून घेणे. मऊशीर शिजवून झाल्यावर गुळ किसून पुरणामध्ये टाकून एकजिव होईल इतपत पातळसर शिजविणे. कोमट असतांनाच मिक्सरमध्ये मऊशीर वाटून घेणे. नंतर कढईत पुरणाचे मिश्रण गरम करुन मध्यम आचेवर हाताला पुरणाची गोळी होईल  इतपत गरम करणे. थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवणे. त्याच बरोबर मैदयामध्ये गरम तेलाचे मोहन घालून हळद मीठ घालून भिजविणे. थोडा मैदा लाटण्यासाठी वेगळा ठेवावा व थंड तेलामध्ये भिजविलेला मैदा घालून पाच सहा तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवणे.
       सर्व्ह करण्यापुर्वी मैदयाची पातळ लाटी करुन त्यात वेलची व जायफळ पावडर मिक्स करुन पसरावी    व पुरण घालून पोळी लाटावी. हे पुरण पारीच्या कडेपर्यत पसरत असल्याने पारदर्शक पुरण पोळी बनते. गरम गरम असतांनाच साजूक तुपामध्ये भिजवावी म्हणजे रेश्मी पुरण पोळी जिभेवर कशी विरघळते व खास पाहुणे आपली स्तुती चोहोकडे कशी पसरवतात  याचा अवश्य अनुभव घ्या.
टिप : पुरण व मैदा ५-६ दिवस फ्रिजमध्ये राहिल्याने आठवडाभरात केव्हाही पुरणपोळी गरमागरम करु शकता.
राहुल भगत

9 comments:

  1. राज्यातील ४ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

    महाराष्ट्र दिनी शिवभोजन थाळीने ओलांडला ४ कोटींचा टप्पा

    - छगन भुजबळ



    मुंबई, दि.1 : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात 26 जानेवारी 2020 ते 1 मे 2021 या कालावधीत तब्बल 4 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

    महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. राज्यात 26 जानेवारी 2020 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय मार्च 2020 मध्ये घेण्यात आलला होता. हा सवलतीचा दर मार्च 2021 पर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने आणि पुन्हा आपण राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे ही थाळी आता आपण मोफत देत आहे. तसेच राज्य शासनाने यापूर्वीच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकमध्ये दिडपट वाढ केली आहे. यात जे शिवभोजन केंद्र दिवसाला 100 थाळ्या वितरीत करत होते आता ते केंद्र 150 थाळ्या वितरीत करत आहे.

    राज्यातील कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या उद्दिष्ठामध्ये वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा मानस देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

    राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब, मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    0000

    ReplyDelete
  2. मसाले बनवा घरच्या घरी🏚*

    *1) गोडा मसाला🎱* (काळा मसाला)
    साहित्य :- धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.
    *कृती :-🥥*
    खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या.🥥 तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.

    *2) पंजाबी गरम मसाला👳🏻‍♂👳🏻‍♀*
    *साहित्य 😗
    1 टी🥄 स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
    *कृती 😗 जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. *टीप -* हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.

    *3) कांदा लसूण मसाला* 🥥🍚🥜
    *साहित्य 😗
    2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्‍या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ.
    *कृती 😗
    वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरवर बारीक करा. (विविध प्रकारच्या रस्साभाज्या व मांसाहारी पदार्थांसाठी उपयोगी.)

    *4) स्पेशल गरम मसाला*
    साहित्य :- पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले).
    कृती :- सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.

    *5) मालवणी मसाला*
    साहित्य :- अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे.
    कृती :- सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.

    *6) कोकणी मसाला*
    साहित्य : - पाव किलो लाल सुक्‍या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप.
    *कृती :- 🍿*
    वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा.

    *7) कच्चा मसाला🍱🍕*
    साहित्य :- अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
    कृती :- सर्व साहित्य कच्चेच मिक्सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.

    *8)🍵 चहाचा मसाला☕*
    साहित्य :- 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ.
    *कृती :-🍿* वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारीक करा.

    *9) दूध मसाला🥛*
    *साहित्य :- 🍵*
    बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20〽 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड.
    कृती :- वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा

    ReplyDelete
  3. Vaishali bhagat11 May 2021 at 04:10
    10) *सांबार मसाला🍛*
    साहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.
    कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.

    11) *🍔पावभाजी मसाला🍞*
    साहित्य :- लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून, सुंठ पावडर 2 टी स्पून.

    *कृती :-🍯🥙*
    सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा.

    ReplyDelete
  4. !!🙏!!👩‍👦🤱

    " अगं दारातच आहे म्हणून काय खंडीभर कढीलिंब घालशील का आमटीत ? स्वादा पुरती पाच सहा पानं पुरेशी आहेत " - सहज बोलता बोलता आई शिकवून जायची.🌿

    खुर्चीवर बसून माझा स्वयंपाक बघता बघता सांगत होती " फोडणीत कांदा परतत आहेस ते ठीक आहे गं. टोमॅटो लागलीच घालू नकोस. टोमॅटो अॅसिड सोडतं त्यामुळे नंतर फोडणीत टाकलेली भाजी शिजत नाही. भाजी शिजल्या नंतर टोमॅटो घाल म्हणजे वेळही वाचेल, भाजीही शिजेल. शाळेत शास्त्र विषय असतो ना तो आचरणात आणायचा गं." M.Sc नसलेली आई सहज बोलून जायची.🌰🌰✅ 🍅🍅❌

    " कुकरच्या झाकणावर वाटीत पाणी घालून चिंच भिजत घाल म्हणजे आपसूक गरम पाण्यात भिजेल आणि पटकन भरपूर कोळ निघेल. " optimum utilization of resources हे शब्दही माहीत नसलेली आई सांगून गेली.♨️

    "पोळीसाठी तवा तापेपर्यंत जिरं टाक त्याच्यावर. ताव वाया जात नाही गं. वेलदोडापण जरा शेकवून घ्यावा अशावेळी. नंतर जेव्हा साखरे बरोबर कुटशील ना, तेव्हा लवकर कुटला जाईल. " side by side परस्पर होणारी कामे सोप्या कृतीतून शिकवून गेली. ते time management का काय म्हणतात ना ते हेच बरं का.⏰

    " अगं दुधाचं पातेलं घासायला टाकू नकोस. कणीक भिजव त्यात. भांडही स्वच्छ, पोळ्याही मऊ होतील ". परातीपेक्षाही लवकर कणीक पातेल्यात मळली जाते हे ही आपसूक कळले.

    " कैरीची डाळ अर्ध बोबडीच ठेव हो. त्या तुमच्या मिक्सरमधे फाsssर बारीक होते त्या आधीच तो मिक्सर थांबव. मिक्सरला विरोध नाही हो माझा. तुम्ही का कामाधामाला सकाळी सकाळी बाहेर पडणा-या मुली पाट्यावर वाटत बसणार आहात डाळ ? उलट मला तर तुमचे फार कौतुक वाटते घरदार सांभाळून आठ दहा तास बाहेरही कामं करता तुम्ही मुली. फक्त आपण जेव्हा उपकरणं घेतो त्याच्याबरोबर आलेली माहितीपुस्तिकाही वाचावी की जरा. किती स्पष्ट शब्दात सांगितलंय त्या कुकरबरोबरच्या पुस्तिकेत वाफ आल्यावर शिट्टी लावावी. पण टीव्ही बघण्यात डिस्टर्ब नको म्हणून आधीच लाऊन टाकता शिट्टी. प्रत्येकाचं एक शास्त्र असतं गं. शाळेच्या प्रयोगशाळेत सहज रमणा-या मुली तुम्ही. कधीतरी स्वयंपाकघर रूपी प्रयोगशाळेतही डोकवा गं. " 📑📃📄📖

    आssई तुझी आठवण येतेsss😥

    " संध्याकाळच्या हळदीकुंकवासाठी कैरीची डाळ दुपारी बाराला भिजत टाक हो. उगीच सकाळी सात- आठ पासून आंबवत बसू नकोस डाळ. साडेपाचला कैरी किसून लगेच डाळीत मिक्स कर आणि आधी करून ठेवलेली, कुटलेलाच हिंग घालून खमंग केलेली गार फोडणी घाल त्याच्यावर. फोडणी गार नसेल तर उन्हाळ्यात डाळ फणफणेल आणि रात्रीच खराब होईल." Heat technology कशाशी खातात हे दूरान्वयानेही माहित नसलेली आई बोलून जाते. 🍲

    " गवार कधीही चिरायची बिरायची नाही हं. एकेक शेंग घेऊन शेंगेचं देठ काढून शिरा असतात कडेला त्या काढायच्या आणि मगच शेंगा मोडायच्या. नाहीतर खाताना शिरा तोंडात येतात." नंतर तोंडं वेडी वाकडी करू नयेत म्हणून आधीच काळजी कशी घ्यायची हे शिकवून गेली.

    आलं लसणाची कसली गं आधीपासून पेश्टं करून ठेवता. उग्र वास इतर पदार्थांना लागतो आसपासच्या. छोटा खलबत्ता असेल ना दगडाचा तर मोजू अर्ध्या मिनीटात ठेचून होतं ताजं आलं लसून. छान रस सुटतो खलबत्यात. वाटलेलं आलं लसूण काढल्यावर खलबत्त्यात पाणी घालून ते पाणी पण घाल हो भाजी आमटीत. सगळा आल्याचा रस वापरला जातो." 🤥

    " तुम्हा मुलींना काकडी कोचवण्याचा कसला गं कंटाळा येतो ? चिरलेली, किसलेली काकडी आणि विळीवर गोल फिरवून फिरवून कोचवलेल्या काकडीची कोशिंबीर याच्या चवी चवीत फरक असतो गं. घ्यावे की जरा कष्ट जीवाला. " 🥒🥒

    Life skills असले जडबंबाळ शब्द न वापरता रोजच्या जीवनात लागणारी शिकवण देऊन गेली बिचारी.😞

    मातृदिन ! !🙏!!

    सुवर्णा कुलकर्णी
    9 मे, 2021

    ReplyDelete
  5. *उपासाचे पूर्ण ताट*

    ♦️वरण- सुरणाची आमटी
    ♦️भात -भगर
    ♦️भाजी -भोपळा
    ♦️पोळी -राजगिऱ्याचे फुलके
    ♦️चटणी -नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची.
    ♦️कोशिंबीर -काकडीची
    ♦️लोणचे- लिंबाचे उपवासाचे
    ♦️भजी-रताळे पॅटीस.
    ♦️डेझर्ट- खजूर मिल्कशेक.


    १) *सुरणाची आमटी करा मस्त*
    🔹सुरणाच्या फोडी करून चिंच घातलेल्या पाण्यात कुकर मध्ये उकडून घ्यायच्या.
    🔹त्या मिक्सर मधून काढताना त्यात जिरं, मिरची, आलं,(चिंच हवी असल्यास अजून) घालून वाटून घ्यायचे.
    🔹पाणी घालून आणि त्या वाटलेल्या सूरणाला तूप जिऱ्याची फोडणी घालायची.
    🔹दाण्याच्या आमटी पेक्षा ही पचायला हलकी असते.

    २) *उपासाचे थालीपीठ*
    🔅राजगिरा , शिंगाडा दोन्ही पीठे एकत्र करून घ्यावीत.
    🔅त्यात थोडी भगर मिक्सरला पीठ करून घ्यावे.
    🔅या पिठात प्रमाणामध्ये वाटलेले जिरे, मिरची / तिखट, मीठ घालावे
    🔅सर्व एकत्र करून फुलके /थालीपीठ करावे.
    🔅 शिंगाड्याचे पीठ अगदी थोडं घ्यावे. नाहीतर पीठ चिकट होतं.
    🔅बरोबर नारळाची चटणी करावी

    ३) *सुरणाची भाजी*
    🔅सुरणाच्या लहान फोडी करून घ्याव्यात.
    🔅त्या थोड्या वेळ चिंचेच्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
    🔅आणि मग त्याला जिरे, मिरचीची फोडणी द्यावी.
    🔅भाजी प्रमाणे शिजवून घ्यावी.

    ४) *सुरणाची चटणी*
    अगदी कवठाच्या चटणीसारखी छान लागते.
    💠सुरणाच्या कच्च्या फोडी ( चिंचेच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवून धुवून घ्याव्यात) त्यात जिरे, लाल तिखट मीठ, गुळ, आणि किंचित चिंच असं टाकून मिक्सर मध्ये चटणी करावी.

    ५) *सुरण / रताळेचे पॅटीस*
    ●सुरण / रताळे ( किंवा दोन्ही एकत्र ) उकडून किसून घ्यावे.
    ●त्यात हिरवी मिरची जिरे वाटून टाकायचे.
    ●ते सगळे व्यवस्थित मिक्स करून त्याचे चपटे गोळे करायचे
    ●आणि तुपावर शॅलो फ्राय करायचे.

    *चटणी* चिंच गुळाची गोड चटणी करावी. खोबऱ्याची चटणी पण छान लागते.

    ६) *भगर जिरा राईस*
    🔸भगर धुवून घेऊन त्याला तूप व जिऱ्याची फोडणी द्यावी.
    🔸फोडणीत आवडीनुसार मिरची, तिखट टाकावे.
    🔸त्यात लाल भोपळ्याचे तुकडे, काकडीचे तुकडे, ओला नारळ असं टाकून चांगले एकत्र करून घ्यावे.
    🔸मग त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे ( भगर साठी पाणी साधारण अडीच पट टाकावे.)
    🔸उकळी आली की त्यात धुतलेली भगर टाकून शिजवायचे.
    🔸आवडत असेल तर त्यात गूळ चिंच पण घालावे. छान लागते.

    ७) *उपासाचे घावन / डोसा*
    ★भगर धुउन जरा वेळ भिजवायची.
    ★ मग बारीक वाटायची आणि मीठ टाकून पीठ तयार करून घ्यायचे.
    ★ तव्यावर डोसा करायचा
    ★ भगर वाटताना जर त्याच्याबरोबर हिरवी मिरची, जिरे टाकावे.
    ★वरतून कोथिंबीर टाकली तरी ते चांगले लागते
    ★मग त्याच्याबरोबर भाजी वगैरे कसली गरज लागत नाही
    ★दह्याबरोबर पण छान लागते.

    ८) *लाल भोपळ्याची खीर*

    ⚡लाल भोपळा धुऊन, साल काढून, किसून घ्यायचा.
    ⚡मग तो तुपावर थोडासा परतायचा.
    ⚡वाफ आली की त्यात दूध टाकायचं, साखर टाकायची
    ⚡छान उकळायचे
    ⚡झाली खीर तयार.

    ९) *रताळ्याचा किस*
    🔸रताळे स्वच्छ धुऊन सालं काढून किसायचे. 🔸मग तूप जिर्‍याची फोडणी करून त्याच्यावर तिखट किंवा मिरची तुकडे टाकून त्याच्यावर रताळ्याचा किस परतायचा.
    🔸 चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, ओलं खोबरं, कोथिंबीर असं सगळ टाकून हलवून छान व वाफ आणायची. 🔸🔸बटाट्याच्या किसा सारखाच करायचा छान लागतो

    १०) *खजूर मिल्कशेक :*
    💠खजूर बिया काढून स्वच्छ धुऊन घ्यायचा.
    💠 खजूर, दूध, थोडीशी साय आणि साखर एकत्र करून मिक्सरवर वाटायचं.
    💠खजूर मऊ नसेल तर थोडा वेळ दूधात भिजत ठेवायचा.
    💠बारीक करताना थोडे काजू बदाम मिक्स केले तरी छान लागतात.

    😋

    *अशी ही आपली उपवास थाळी 'एकादशी दुप्पट खाशी' without बटाटा, दाण्याचा कूट आणि साबुदाणा*.


    *पाककृती लिखाण : मालगुंड 🌊 सखी*

    ReplyDelete
  6. माणूस किती विचित्र आहे पहा! आपल्या घरी देव आला म्हणजे आनंद व आपण देवाघरी गेलो म्हणजे दुःख .आपल्या घरी देव यावा म्हणून आटापिटा व आपण देवा घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. अरे बाबा, देवा घरून येणे म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू. हे दोन्ही अटळ आहे पण या दोघांमधील गंमत म्हणजेच आयुष्य. जन्म घेताना श्वास असतो पण नाव नसतं आणि मरताना नाव असतं पण श्वास नसतो, म्हणजेच नाव आणि श्वास यामधल्या अंतराला आयुष्य म्हणतात. तुकोबाराय सांगतात... *क्षणभंगुर, रे नाही भरवसा!* *व्हा रे सावध माया पाशा!*.... म्हणून शंभर वर्षे जगण्यापेक्षा असं काही कार्य करा की ज्याद्वारे आपण गेल्यानंतरही शंभर वर्षे लोकांच्या मनात राहू.
    🌹

    ReplyDelete
  7. मायक्रोवेव्हमध्ये केलेला पिकलेल्या आंब्याचा मुरंबा.सहा आंबे चोकोनी फोडी करून चिरून,त्यात तीन वाट्या साखर मिसळून ठेवा.नंतर मायकोवेव्हमध्ये फुल पॉवरवर सहा मिनिटे ठेवा.मध्ये दोन वेळा ढवळा. पुढची सहा मिनिटे 50%पॉवरवर ठेवा,मध्ये एक वेळ ढवळा.पुढे फुल पॉवरवर एक /एक मिनिट ठेवून ढवळत रहा. पाक जरा पातळ असतानाच मावे बंद करा.बाहेर काढून ढवळा,थंड होता होता घट्ट होईल.थंड होताना पाच /सहा लवंगा घाला.

    ReplyDelete
  8. *"तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका, आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणता .. अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?"*
    असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून, निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना ही पोस्ट समर्पित आहे.

    अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २८ शाकाहारी चविष्ट आणि तरीदेखील पौष्टिक पदार्थांची यादी देत आहे. महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का ?
    उत्तर पोस्ट च्या तळाशी सापडेल ..

    अहं! आधी पोस्ट पूर्ण वाचा ..

    माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले की, हे पदार्थ आवडीनें करून खातात ..

    त्यामुळे व्यर्थ कारणें/सबबी मराठी लोकांनी तरी देऊ नयेत ..

    *नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ..)*

    *(लेखिका : वैद्य - रुपाली पानसे, आद्यं आयुर्वेद , पुणे)*

    १.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबरे/तीळ चटणी बरोबर ..)

    २. मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप

    ३.मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक)

    ४. मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.

    ५. फोडणीची ताक भाकरी.

    ६. ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे

    ७. भाकरी गूळ तुपाचा लाडू.

    ८. दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून

    ९. किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा.

    १०. नाचणीची उकड

    ११. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.

    १२. शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा, टोमॅटो शेव घालून

    १३. ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी

    १४. खारीक, खोबरं, डिंक मेथीचा पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .

    १५. मिश्र पिठाचा ढोकळा - पुदिना जवस चटणी बरोबर

    १६. तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)

    १७. मिश्र पिठाचे धिरडे व चटणी

    १८. मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.

    १९. गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी

    २०. ओले खोबरें, मटार, मका, भाज्या, हिरवी मिरची इ. घालून फोडणीचा, गव्हाचा दलिया

    २१. खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी

    २२. गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर

    २३. सालीच्या लाहीचा चिवडा - कांदा, टोमॅटो, शेव घालून - भेळेसारखा

    २४. फोडणीच्या तिखट शेवया

    २५. रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )

    २६. रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा

    २७. मुगाची डाळ शिजवून, त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा

    २८. फोडणीची भगर आणि ताक.

    *२९, ३० वा पदार्थ जाहीर नाही कारण, जर २८ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने, आळीपाळीने खाल्ले तर २ दिवस तुमच्या हक्काचें असतील ..*

    भरपूर बटर लावून ब्रेड, टोस्ट खा किंवा, वैशाली, वाडेश्वर अथवा तत्सम ठिकाणीं जाऊन इडली, डोसा, उडीद वडा इत्यादींचा आनंद घ्या ..

    *वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८*

    *(वाटल्यास .. कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी. तुमच्या या कृतीने, लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. धन्यवाद !!!)*

    ReplyDelete
  9. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी

    पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा

    मुंबई, दि. ११ : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच यामाध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

    स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसीपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.

    महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रीय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वह्राडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रीय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसीपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअनुषंगानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक डॉ. सावळकर यांनी केले आहे.

    स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडिओ रेसीपी ऑनलाईन सबमिट करावयाची आहे. 11 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा असेल. व्हिडिओ किमान 30 सेकंद आणि कमाल 15 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडिओचा आकार 100 एमबीपर्यंत असावा. व्हिडीओ रेसीपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखीत स्वरुपातही सोबत सादर करणे आवश्यक आहे. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओवर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरला जाऊ शकतो. व्हिडिओंना कोणताही वॉटरमार्क नसावा, असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाईल.

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi