Thursday, 25 November 2021

 गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.


            गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू,सुपारी व इतर पदार्थांच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.


            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे जाळे मजबूत करावे, तसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारींवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल असे सांगितले.


००००


‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा


महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर


           


            मुंबई, दि. 25 : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ हे मिशन आम्ही हाती घेतले आहे.‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.


               मिशन वात्सल्यबाबत आढावा बैठक महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या आढावा बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल, सर्व विभागीय महसूल आयुक्त उपस्थित होते.


                महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या वात्सल्य समितीमार्फत सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणामध्ये शासकीय योजनांची माहिती घेणारा नमुना विकसित करून सर्व तालुक्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करून घ्यावे. या महिलांच्या कुटुंबांना भेटी दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न समजणार नाहीत. यासाठी प्रत्येक तालुक्यातील वात्सल्य समितीच्या सदस्यांनी त्या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गट करून घरोघरी भेटी द्याव्या. त्यातून त्यांचे प्रश्न समजू शकतील .याबाबत सर्व जिल्ह्यांनी नियोजन करायला हवे.


         मिशन वात्सल्यबाबत विभागीय स्तरावर महिन्यातून एकदा, जिल्हास्तरावर महिन्यातून दोनदा व तालुकास्तरावर आठवड्यातून एक बैठक घेण्यात यावी. या सर्व बैठकीचा आढावा आयुक्त महिला व बालविकास यांना पाठवावा. या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीने समन्वयाने काम करावे. प्रत्येक जिल्ह्यांनी मिशन वात्सल्य च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची महिती पुस्तिका तयार करावी व ती महिलापर्यंत पोहचवावी. विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आपण सर्वजण मिळून पूर्ण करू, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.


         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi