Thursday, 24 February 2022

 24 फेब्रुवारीपासून मुंबईत कला प्रदर्शनाचे आयोजन

            मुंबई, दि. 23 :- कला संचालनालयामार्फत 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालय, येथे दि. २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च, २०२२ या कालावधीत होणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि. २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सर ज.जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे होणार आहे. यावेळी कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे उपस्थित राहणार आहेत.

            ज्येष्ठ कलाकार वसंत सोनवणी यांचा व 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्यावतीने सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती श्री. मिश्रा यांनी दिली. 

            पारितोषिक प्राप्त कलाकार :गौरी अमर भिसे (उपयोजित कला-महिला आरोग्य समस्या), प्रसाद चंद्रकांत गवळी (उपयोजित कला- वन्यजीव संवर्धन), प्रितीश विजय ताजणे (उपयोजित कला-स्वच्छ भारत), राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला- वस्तुस्थिती), अंजली सुधीर पवार (उपयोजिक कला-दि टॅबू), आनंद शत्रुघ्न प्रताप (रेखा व रंगकला-अनागमी), संघपाल उत्तम म्हस्के, (रेखा व रंगकला-फॉर्मसी लॅब), मदन किसनराव पवार (रेखा व रंगकला-लॉकडाऊन सिटी-1), सुभाष बाभूळकर (रेखा व रंगकला-अनटायटल्ड-2), स्वाती विश्वनाथ साबळे (रेखा व रंगकला- अनटायटल्ड), हर्षवर्धन प्रकाश देवतळे (रेखा व रंगकला- प्रकाशाच्या विभिन्न दिशा), श्रीनिवास गोविंदराव म्हेत्रे (मुद्राचित्रण-स्टे अफ्लोड टूगेदर), वैभव मारुती मोरे (शिल्पकला- इटर्नल इमेज), नंदकुमार यशवंत कुलये, (शिल्पकला- इंटॅंजिबल इन टँजिबल), दिव्यांग विभागात सचिन भाऊसाहेब निंबाळकर (मुद्राचित्रण- कलयुग) या कलांवतांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

0000


 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता सवय बनणे आवश्यक

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

  • मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाचा शुभारंभ

 

            मुंबईदि. २३ : मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला 'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षहे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईलअसे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

            'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा'चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेमुंबईचे उपमहापौर ॲड सुहास वाडकरस्थानिक आमदार मंगलप्रभात लोढाबेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकरबेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रामहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.संजीवकुमारउपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसेडब्ल्यूआरआय इंडियाच्या सिटीज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माधव पैनागरी विकास उपक्रम प्रमुख  लुबायना रंगवालाइलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक चैतन्या कानुरीसल्लागार कौस्तुभ गोसावीपर्यावरण सल्लागार तन्मय टकले आदी उपस्थित होते. वर्ल्‍ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणालेवातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्यशासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या 386 बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन 2027 पूर्वी 100 टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून श्री.ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

            राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणालेवातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरिता शक्य त्या सर्व उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून हवा आणि ध्वनीचे प्रदूषण थांबविणे तसेच इंधनाचा वापर कमी करणे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही त्यापैकीच एक उपाययोजना आहे. मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन कक्षामार्फत प्रयत्न करण्यात येणार असून या उपक्रमाला शुभेच्छा. मुंबईसह राज्यात लवकरच मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने धावू लागतील आणि वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यात आपण आघाडीचे राज्य बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            उपमहापौर ॲड.वाडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महानगरपालिकेमार्फत देशातील पहिला ईव्ही सेल स्थापन करण्यात आल्याचे सांगून केवळ बेस्टची वाहनेच नव्हे तर रस्त्यावर धावणारी सर्वच वाहने ईव्ही व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली. तरआमदार मंगलप्रभात लोढा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयांचे आणि वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

            बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देऊन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात खरेदी करण्यात येणाऱ्या संपूर्ण बसेस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन असल्याचे सांगितले.

            महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाच्‍या माध्‍यमातून शासकीय अधिकारीई-मोबिलिटी तज्‍ज्ञइलेक्ट्रिक व्‍हेईकल उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्‍याचे कार्य केले जाणार आहे. विद्युत वाहनांच्‍या प्रचारासाठी निर्णय घेण्‍यासाठी धोरणकर्त्‍यांना सहाय्य करणेमुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणेविद्युत वाहनांच्‍या खरेदीसाठी सुलभरित्‍या कर्ज सुविधा उपलब्‍ध करुन देणेवाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अंमलात आणणेबेस्‍टच्‍या सहयोगाने इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार करणेसार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणेमुंबईत प्रायोगिक तत्‍त्‍वावर कामकाज करण्‍यासाठी इलेक्ट्रिक व्‍हेईकल क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००


 


Wednesday, 23 February 2022

 राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे

संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण

 

        मुंबई, दि. 23 : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशाने आयोजीत होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण करण्यात आले असल्यासंदर्भातील शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

            नव कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावात्या कलागुणांमधुन व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठीहिंदीसंगीतसंस्कृतबालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

            त्यांनी संगीत शारदासंगीत सौभद्रसंगीत मृच्छकटीकसंगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

०००

 चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि. २३ : चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) यांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले.

            चाकण औद्योगिक वसाहत व पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १९ गावांच्या पाणीपुरवठा योजनाबाबत आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणालेया योजनेच्या औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. तर पाणीपट्टी वसुलीचाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) मार्फत करणेत येते. योजनेचे संकल्पित वर्ष हे २०२१ असून लाभार्थी गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने  गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. या योजनेचा संकल्पन कालावधी पूर्ण झाला असल्याने सुधारीत योजनेनुसार समाविष्ट गावांना सध्याचा लोकसंख्येचा दाखला व योजनेत समाविष्ट होण्यास इच्छुक असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्यानंतर सुधारीत योजनेबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            या बैठकीस आमदार दिलीप मोहीते पाटीलअधिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुभाष भुजबळअधिक्षक अभियंता प्रशांत भामरेकार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.

 श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो 

हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे ... अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे

 गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा..

 

 *"गण गण गणात बोते "*

 नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण प्रथम कर्तव्य

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उसर येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा


        अलिबाग, दि. 22 :- कोरोना अजून संपलेला नाही, मास्कची सक्ती कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मात्र ते आताच सांगता येणार नाही. आता आपल्याला हा जो कालावधी मिळाला तो लसीकरण वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील परंतु आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले.

        अलिबाग तालुक्यातील उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते.

        यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, सरपंच अनिता गोंधळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी आमदार सुरेश लाड, सभापती बबन मनवे, महेंद्र घरत, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचविण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील रुग्णालयांचे नूतनीकरण, नवीन रुग्णालयांचे उद्घाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. उद्योग-व्यवसायाचा विकास करताना निरोगी आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

         रायगड जिल्ह्यात या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे भूमीपूजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करीत आहोत, त्याचबरोबर अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करीत आहोत, याचे समाधान वाटते आहे.

        जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या यशस्वीही झाल्या. मुंबई-पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला भविष्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. या महाविद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य राज्य शासनाकडून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

        ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाची सुरुवात होत आहे. वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे अवघड गोष्ट आहे. त्यासाठी कमीत कमी 500 ते 700 बेड्सचे हॉस्पिटल, आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग व साधनसामग्री लागते. महाविद्यालयासाठी वेगवेगळ्या सुविधा उभाराव्या लागतात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कर्माचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारावी लागतात. हे अवघड काम खासदार श्री.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य सरकार व संबंधित मंत्री करीत आहेत. या सर्वांचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मी अभिनंदन करतो. या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.

        श्री.पवार म्हणाले की, मागील दोन वर्षांत कोविड संकटात रुग्णालयांची, अद्ययावत आरोग्य सोयी-सुविधांची गरज किती आहे, ते आपल्याला कळले. अशी रोगराई आल्यानंतर काय होतं, हे आपल्याला जाणवले. या रोगाने संबंध जग आणि देशाला संकटात ढकलले. कोविडमुळे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तसेच आरोग्य सुविधांची किती गरज आहे, याचा अंदाज आपल्याला आला.

        या सगळ्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. अनेकांनी आपले प्राण गमावले. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असे की, संकट आल्यानंतर लोक बाकी सगळे विसरून संकटावर मात करण्यासाठी काम करतात. तेच काम आज मला इथे होताना दिसत आहे. इथे वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल उभारले जात आहे. महाविद्यालय सुरू होणार आहे, यासाठी 76 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियाही पूर्ण केली आहे. हा जिल्हा जागरूक जिल्हा आहे. उत्तम शेती आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याने अनेक संकटांवर आजवर मात केली आहे. नेतृत्वाची खाण असलेला हा जिल्हा आहे. एका ठरलेल्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा करतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे महत्त्वाचे केंद्र बनेल. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असते. या माध्यमातून या वास्तूमध्ये ईश्वरसेवा घडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

        महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, गरजू, गरीब व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. प्रत्येकाने अशा वंचित लोकांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळणारी सेवा ही खूप महत्त्वाची असेल. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई यावर मात करण्यासाठी केलेले काम हीच भारतमातेची सेवा असे पंडित नेहरूंनी म्हटल्याचे सांगितले. गाडगे महाराजांनीही हीच शिकवण दिली.

        शासनाने कोविड संकट काळात खूप चांगले काम केले. या काळात सर्वांनाच खूप शिकायला मिळाले. एकमेकांच्या सहकार्याने या संकटाचा सर्वांनी सामना केला. देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्राने केले. सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांनी कौतुकास्पद काम केले, सेवा केली, हीच खरी ईश्वरसेवा, देशसेवा आहे. भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून आणि गरिबांसाठी मोठी सेवा दिली जाणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी भविष्यात नर्सिंग कॉलेज व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब, गरजू लोकांना चांगला लाभ मिळत असून शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी या शासनाकडून अधिकाधिक प्रयत्न केले जातील. मेडिकल टुरिझमसाठी रायगड जिल्ह्यात खूप चांगली संधी असून अशी व्यवस्था निर्माण झाल्यास येथील भूमीपुत्रांना, स्थानिकांनाही रोजगार मिळविता येऊ शकतील, असे ते म्हणाले.

        पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगडकरांचे अनेक वर्षापासूनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. सन 2010 मध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी या महाविद्यालयाची घोषणा केली होती. राज्यमंत्री व रायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करत असताना या महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती करण्याची मला संधी मिळाली, याचा अभिमान आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये आपले भविष्य घडविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून यशस्वी वाटचाल करता येणार आहे. त्यांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांविषयी विवेचन केले.

        राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील जवळपास 52 एकर जमीन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार वर्षनिहाय व पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 500 खाटांच्या रुग्णालयाकरिता नियमित 496 पदे त्याचप्रमाणे गट-क ची 99 काल्पनिक पदे आणि गट-ड ची 477 कंत्राटी पदे बाह्ययंत्रणेद्वारे, अशी एकूण 1 हजार 72 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार 798 रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, अलिबाग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

        अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्यासाठी सर्व स्तरावर मोलाचे सहकार्य करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख या सर्वांचे त्यांनी आभार मानून रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कापासून कोणीही वंचित राहणार नाही व त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड" हा यशस्वीतेकडे वेगाने मार्गक्रमण करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, अलिबागजवळ उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय साकारते आहे, हा रायगडवासियांसाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. दुर्धर आजार, मोठ्या शस्त्रक्रिया यांसाठी आता मुंबईत जाण्याची आवश्यकता नाही. रायगडवासियांना जिल्ह्याच्या ठिकाणीच ही सुविधा लवकरच या रुग्णालयात मिळेल, याची खात्री आहे. खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील दोन वर्षात शासनाने आवर्जून जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माणगाव येथेही लवकरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू होणार आहे. विशेषतः महिलांसाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध या निमित्ताने होणार आहे.

        या वैद्यकीय महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी नियोजित वेळेत पूर्ण करण्याकडे आमचा कटाक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा व तालुका स्तरावर मिळण्यासाठी व सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आवश्यक आरोग्य सुविधा आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यास सांगितले आहे.

        वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील जनतेला निरोगी ठेवण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीची ही सुरुवात आहे, तर लवकरच उद्घाटन सोहळ्यासाठीही असेच एकत्र जमू. रायगडमध्ये पर्यटनाला वाव आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडको, जे.एन.पी.टी अशा विविध विकासात्मक बाबी येथे आहेत. आयुष आणि ॲलोपथी अशा एकत्र आरोग्य सुविधा एकाच छताखाली आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. आजच्या काळात जिल्ह्यासाठी सर्व सुविधायुक्त रुग्णालये ही काळाची गरज बनली आहे. जिल्हा तेथे शासकीय महाविद्यालय या संकल्पनेस सर्वच स्तरातून मिळालेला पाठिंबा हा निश्चितच अभिनंदनीय आहे. शासन प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक ती आरोग्य सुविधा देण्यास कटिबद्ध आहे.

        खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतातून रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मिळून येथील विकासकामे पूर्ण करू, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी माणगाव येथील 100 खाटांचे विशेष रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरला राज्य शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल शासनाचे विशेष आभार मानले. तसेच भविष्यात 100 खाटांचे आयुर्वेदीक रुग्णालय साकारण्यासाठीही शासनाचे पाठबळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

“गरूडझेप स्पर्धा परिक्षा ॲप” चे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

        जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “गरूडझेप स्पर्धा परिक्षा ॲप”चे उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. याबरोबरच या केंद्रासाठी प्रातिनिधीक स्वरूपात स्पर्धा परिक्षा पुस्तकांचा संचही खासदार शरद पवार यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला.

        रायगड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता गरूडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू करण्यात आले असून दर शनिवारी व रविवारी प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून अनेक विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत.

        महाविद्यालय सुरू होण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल आरसीएफचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांचा विशेष सत्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस भूमीपूजन व कोनशिला अनावरण झाले. श्रीमती मुद्रा गाडे-जोशी यांनी महाराष्ट्र गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता पोलीस बँड पथकानी वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने करण्यात आली. 

 संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसुल करण्याचा

महामंडळाचा कोणताही निर्णय नाही
- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती


        मुंबई, दि. 22 : एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले.
        एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसुली नुकसान भरपाई कामावर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
        दरम्यान, संपामुळे सर्वसामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi