Friday, 28 February 2025

विशेष: शंकराचे आत्मलिंग, श्रीपाद श्रीवल्लभ ३ वर्षे वास्तव्य

 ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

      *🔸श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर.🔸*


*------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील,  रत्नागिरी.*

*------------------------------------------*


*🟣२८/०२/२५- गोकर्ण महाबळेश्वर रथोत्सव...🙏*


*स्थान: कर्नाटक उत्तर, कन्नड जिल्हा...*

*विशेष: शंकराचे आत्मलिंग, श्रीपाद श्रीवल्लभ ३ वर्षे वास्तव्य...*


*या क्षेत्राचा उल्लेख श्रीमद गुरुचरित्र या ग्रंथात आढळतो... येथे श्रीपाद श्रीवल्लभ घरातून निघाल्यानंतर तीर्थ क्षेत्रे फिरत असता याठिकाणी ३ वर्षे राहिल्याचा उल्लेख आढळतो. हे अतिशय पुरातन शिव मंदिर असून अत्यंत प्रासादिक तीर्थक्षेत्र आहे. अनेक जन्मांची पापे येथे केवळ दर्शनाने नाश पावतात असा क्षेत्रामहात्म्यात उल्लेख आहे.....*


*गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंग माहात्म्य...*

*या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रांत कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हयात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्र किनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे... या ठिकाणी 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग (आत्मलिंग) आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली.....*


*आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली..?*

*कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती... एकदा ब्रम्हा- विष्णू- महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. यातील आत्मलिंग हे शंकरांना मिळाले होते. जो या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल.....*


*रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला व ते गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही... तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. स्वत भगवान सदाशिव, भगवान विष्णू, ब्रम्हदेव, कार्तिकेय, गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे.....*


*गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो... सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही. हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो ब्रम्हपदाला जातो.....(संदर्भ- गुरुचरित्र अध्याय ७ वा व स्कंध पुराण)*


*या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत... सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे होते. त्रेतायुगात ते तांबूसवर्णाचे होते, द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे होते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा गोकर्ण क्षेत्री केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे सुद्धा मंदिर आहे तसेच गोकर्णापासून ३० कि मी अंतरावर मुरुडेश्वर हे अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ या पवित्र क्षेत्री ३ वर्षे वास्तव्यास होते.....*


*पूजा व अभिषेक...*

*रुद्राभिषेक, नवधान्य, चांदीचा नागकेशर, व सोन्याचा नागकेशर इत्यादी अभिषेक या ठिकाणी होतात..... (रुपये २५१ /- पासून १५००/- पर्यंत)*


*निवास...*

*या ठिकाणी भक्तांना निवासाकरिता शुल्करहित मंदिरातील ब्राम्हणांची घरे आहेत व तसेच लॉजसुद्धा उपलब्ध आहेत.....*


*महाप्रसाद...*

*या ठिकाणी दिवसातून दोन वेळेस महाप्रसाद मिळतो दुपारी १२:०० ते २:०० व रात्री ७:३० ते ८:३०*


*गोकर्ण महाबळेश्वरला कसे जाल..?*


*गाडीने...*

*कर्नाटक राज्यात हे ठिकाण आहे... नांदेड वरून गाडीने जाणार असाल तर एकूण ७०० कि. मी. प्रवास होतो व १४ ते १५ तास लागतात. मार्ग- नांदेड - लातूर - सोलापूर - हुबळी - येल्लापूर - अंकोला - गोकर्ण महाबळेश्वर.....*


*रेल्वेने...*

*रेल्वेने प्रवास असेल तर नांदेड वरून सकाळी ८:३० मि. देवगिरी एक्सप्रेस ने सिकंदराबाद ला जावे... लगेच दुपारी ४:०० वाजता हुबळी एक्सप्रेस ने हुबळी स्टेशन वर सकाळी ६;०० वाजता उतरावे व तेथून बसने अंकोला व गोकर्ण महाबळेश्वर ला उतरावे. (हुबळी ते गोकर्ण एकूण ५ तास लागतात). तसेच मुंबई, पुणे येथून आठवड्यातून एकदा गोकर्ण महाबळेश्वर ला जाण्याकरिता रेल्वे आहे.....*


*गोकर्ण महाबळेश्वर निर्मिती कथा  (संदर्भ- गुरुचरित्र...)*

*त्रेतायुगात राक्षसांचा राजा ‘रावण’ हा लंकेवर राज्य करीत होता. लंकाधीश रावण हा अत्यंत दृष्ट व महापराक्रमी राजा असला तरीदेखील शिवभक्त म्हणून ओळखला जाई... रावणाची माता कैकसी हीदेखील शिवभक्त होती. कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन मातीचे शिवलिंग तयार करी, त्याची प्राणप्रतिष्ठा करुन पूजा व अभिषेक करत असे. मात्र समुद्राच्या प्रवाहात हे मातीचे शिवलिंग वाहून जाई. तरीदेखील कैकसीचा नित्यनेम चुकत नसे. हे पाहून एकदा रावण कैकसीस म्हणाला “माते तू रोज मातीचे शिवलिंग तयार करुन त्याची पूजा का करतेस? मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकरांचे आत्मलिंग आणून देतो. आत्मलिंग म्हणजे शंकरांच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग, ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचे फळ मिळते.....”*


*रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्तही होता... आपल्या मातेस महादेवांचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकराची कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, “लंकाधीश, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग.” मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली. शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करुन ते रावणाच्या हाती दिले व म्हणाले, “लंकाधिपती, हे माझे आत्मलिंग आहे. हे तुझ्या लंकापूरीत घेऊन जा, तिथे याची स्थापना कर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस. हे जिथे ठेवले जाईल तिथेच ते स्थापन होईल.” भगवान शंकरांची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला.....*


*भगवान शंकरांनी महापराक्रमी पण दृष्ट रावणास आत्मलिंग दिल्याचे समजताच सर्व देवदेवता चिंतेत पडले... साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेस लाभल्याने दृष्ट रावण अधिक बलशाली व दिग्वीजयी होईल. त्याचा उन्मतपणा आणखी वाढेल व देवगणांना याचा त्रास होईल या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवदेवतांनी श्रीनारदमुनींसह विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे धाव घेतली. श्रीगणेशास आपली विवंचना सांगून रावण आत्मलिंग घेऊन लंकेस पोचता कामा नये अशी विनंती केली. श्रीगणेशाने देवांची विनंती मान्य करुन त्यांना निश्चिंत होण्यास सांगितले.....*


*श्रीगणेश एका ब्राह्मण बालकाचे रुप धारण करुन रावणाकडे निघाले... रावण समुद्रकिनाऱ्याजवळ येताना दिसताच, श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचे नाही मग आता संध्या कशी करायची? असा विचार करीत असतानाच, रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले. रावणाने बालगुराख्यारुपी गणेशास मदत मागितली. रावण गणेशास म्हणाला, “मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत कर. मी समुद्रात जाऊन संध्या करुन येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ, मी लगेचच येतो. पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस.” बालगुराखीरुपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली व त्यास सांगितले, “महाराज, मी आपणांस मदत करण्यास तयार आहे. परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरुन राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणांस तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या अन्यथा मी हे खाली ठेवीन” बालगुराखीरुपी गणेशाचे म्हणने मान्य करुन रावण संध्येस निघून जातो.....*


*रावणाने संध्या सुरु करताच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतो... तो घाईघाईने रावणास तीनदा हाक मारतो व हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेऊ नकोस अशा इशारा रावण लांबून करुनही तिकडे लक्ष न देता गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेऊन देतो. श्रीगणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवदेवता आनंदाने श्रीगणेशावर फूलांची वृष्टी करतात. हे पाहून रावणास कळून चुकते की, हे काम देवदेवतांचेच आहे. क्रोधीत रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आत्मलिंग तसूभरही हलत नाही. मग आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्वशक्तीनीशी आत्मलिंग जोरजोरात हलवितो आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परततो.....*


*गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर)... अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले व कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण ‘गोकर्ण महाबळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असेदेखील संबोधले जाते.....*


*आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या... गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले:*


*१) गोकर्ण महाबळेश्वर- महादेवांचे मुख्य आत्मलिंग...*

*२) सज्जेश्वर- आत्मलिंग आणलेला डबा पडला ते ठिकाण... (३५ कि. मी. अंतरावर)*

*३) धारेश्वर- आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण... (४५ कि.मी. अंतरावर)*

*४) गुनावंतेश्वर- जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण... (६० कि. मी. अंतरावर)*

*५) मुरुडेश्वर- आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण ... (७० कि. मी. अंतरावर)*


*अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्रीगणेशामुळे 'गोकर्ण महाबळेश्वर' या ठिकाणी स्थापना झाली.....*

*स्रोत: आंतरजाल,  dattamaharaj.com*

❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi