महाड दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू;
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची केली विचारपूस
● जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार
● संकटात शासन पाठीशी असल्याची दिली ग्वाही
मुंबई, दि. 26 : अतिवृष्टीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.
सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट दिली. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर येथे उपचार सुरू असून सर्व जखमींची यावेळी त्यांनी विचारपूस केली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ज्या जखमींवर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही जखमींवर अतिदक्षता रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरडग्रस्तांना सर्व आवश्यक ती मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही श्री. अमित देशमुख यांनी सांगून या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय पूरग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. डेंग्यूसह इतर रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे. या संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.
००००
पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते बंद,
469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली
मुंबई, दि. 26 : राज्यातील कोकण व पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पूल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार, सातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता श्री. साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता श्री. उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव श्री. रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार, 290 रस्ते बंद झाले आहेत. तर 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे. 140 पूल व मोऱ्या हे पाण्याखाली गेले आहेत.
No comments:
Post a Comment