Friday, 4 August 2023

अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल

 अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम


 


            मुंबई, दि. 3 :- 'अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सुदृढ संबंध उज्वल भविष्य घडविण्यात महत्वपूर्ण ठरतील,' असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.


            अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            कार्यक्रमास अमेरिकेचे भारतातील राजदूत एरीक गार्सेटी, दूतावास प्रमुख माईक हॅन्की, पद्मश्री श्रीमती रीमा नानावटी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर - पाटणकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित अमेरिकन वकिलात, वाणिज्य दूतावासाशी निगडित वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक तसेच मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणातील योगदान उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेतील मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात या मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब पडले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील. या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जगातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जातील,असेही त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास गतीने होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमधील कौशल्य विकास, मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी 'लेक लाडकी' योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. स्त्री- पुरुष समानतेवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगित

ले.


00000



 


पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार

 पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार


- पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


          मुंबई, दि. 3 : पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.


            सदस्य रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग

 घेतला.


वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार

 वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार


- मंत्री दादाजी भुसे


                      मुंबई, दि. 3 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


               सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


               मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करतात. भविष्यात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता तसेच अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


                  यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.


****

आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत

 आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत


महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबई, दि. 3 : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधाबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.


                  सदस्य रवींद्र वायकर यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान आरे वसाहतीतील रस्ते देखभाल, पथदिवे, वैद्यकीय सुविधा याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसात आरेमध्ये तीनशेपेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज अशा मूलभूत सोयीसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांचीप्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही

 सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांचीप्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 3 : सोलापूर जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य जयंत पाटील यांनी याअनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येतो. सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांत एकूण 299 चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. त्याकरिता सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये एकूण 245.23 कोटी इतके अनुदान जिल्हाधिकारी, सोलापूर यांना वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 206.55 कोटी इतके अनुदान चारा छावणी चालकांना वितरीत करण्यात येऊन, उर्वरित 38.68 कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी समर्पित केला होता. सांगोला तालुक्याकरिता 146 चारा छावण्यांसाठी 131.77 कोटी इतका निधी वितरित केला होता. त्यापैकी 109.20 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित झाला व उर्वरित 22.56 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला. तसेच मंगळवेढा तालुक्याकरिता 61 चारा छावण्यांना 47.81 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी 33.17 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित करण्यात येऊन उर्वरित 14.64 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला.


            एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. तथापि त्यात त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडील बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधारित प्रस्ताव 28 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार शासनास प्राप्त झाला आहे. पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित विधान परिषद सदस्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.


00000




Thursday, 3 August 2023

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

 विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड



मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली.


            त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी श्री.वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.


विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विरोधी पक्षनेते श्री.वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.


विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर


सभागृहाला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा लाभलेली आहे. या पदावर विराजमान व्यक्तीची जबाबदारी अधिक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार हे सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी व्यक्त केला.


            विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य फक्त समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे नाही तर, वेळप्रसंगी काही घडताना जे लोक गप्प राहतात त्यांना ते लक्षात आणून देणे, हे आहे. श्री. वडेट्टीवार ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. यापूर्वीही सभागृहातील विविध खात्यांच्या मंत्री पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. वन कामगार, शेतकरी, विद्यार्थी, वनशेती आंदोलने त्यांनी केलेली आहेत. लोकहिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे नेते, अशी त्यांची प्रतिमा आहे, असे सांगून कर्तृत्ववान नेत्याला या सभागृहाच्या विरोधीपक्षनेता नियुक्तीबद्दल मी शुभेच्छा देतो, असेही ॲड. नार्वेकर म्हणाले.


लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता हे पद महत्त्वाचे आहे. विजय वडेट्टीवार ही जबाबदारी सक्षमतेने सांभाळतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. वडेट्टीवार यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्राला विधायक काम करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. राजकारणातील गैरसमज दूर करणे, राजकारण लोकाभिमुख करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. मतमतांतर, विचारांचे आदानप्रदान झालेच पाहिजे. विकासकामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एखादी गोष्ट पटली नाही तर जरुर टीका करावी, मात्र चांगल्या गोष्टीचे कौतुकही त्यांनी करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री. वडेट्टीवार यांनी त्यात सक्रीय सहभाग घेतला व त्याचे नेतृत्व केले. याशिवाय, गडचिरोली जिल्हा व्हावा म्हणून त्यांनी सातत्याने आंदोलने केली. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र त्यांनी आजवर कायम पाळले आहे. राज्यातील शेतकरी, दुर्बल घटक, महिला यांना अधिकाधिक सक्षम करायचे आहे. विरोधाला विरोध किंवा राजकीय अभिनिवेष बाजूला ठेऊन महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी विरोधीपक्षनेता म्हणून ते सहकार्य करतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सभागृच्या विरोधी पक्षनेतेपदी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते. जनसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय करून घेतले आहेत. विजय वडट्टीवार यांची जमिनीशी जोडलेला नेता म्हणून ओळख आहे. जनतेच्या हितासाठी ते व्यापक कार्य करतील, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी जिथे शासनाचे चुकले, तिथे त्यांना धारेवर धरले. अनेक वेळा संपूर्ण सभागृह एकत्र असले पाहिजे, त्यावेळी एकदिलाने त्यांनी अनेक प्रस्ताव मांडले आहेत, ही परंपरा आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा मान सन्मान वाढविण्याकरिता विजय वडेट्टीवार हे काम करतील. ते संवेदनशील नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल, असा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.


विरोधी पक्षनेते जनतेच्या भावना तडफेने मांडतील - उपमुख्यमंत्री अजित पवार


          राज्यातील जनेतेचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे कार्य शासन करतच आहे. मात्र, जनतेच्या भावना सभागृहाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार हे जबाबदारीने व तडफेने पूर्ण करतील, अशा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला


            श्री. पवार म्हणाले की, आक्रमक स्वभाव, सामाजिक प्रश्नांची जाण आणि वैचारिक बैठक असणारे विजय वडेट्टीवार आपल्या कर्तव्यात कमी पडणार नाहीत. ते तडफेने आपली जबाबदारी पार पाडतील. शासनाच्या जनहिताच्या निर्णयांना त्यांच्याकडून पाठिंबा देखील मिळेल. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मोठी परंपरा आहे. या पदावर काम केलेल्या व्यक्तींनी पुढे राज्यात आणि केंद्रातही मोठमोठ्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन करतानाच त्यांना शुभेच्छाही देतो. यापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी काही काळासाठी सांभाळली होती. पुढील काळातही ते चांगले काम करतील आणि जनतेचा विश्वास संपादन करतील, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली


सर्वसामान्यांसाठी नेहमीच आवाज उठविणार- विजय वडेट्टीवार


आपण मोठ्या संघर्षातून या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे. केवळ राजकारणाच्या भावनेतून कोणत्याही प्रश्नाकडे न पाहता त्यातून सामान्य माणसाला न्याय मिळेल, यासाठी कायम कार्यरत राहू. त्यांच्या प्रश्नांसाठी कायम आवाज उठवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर दिले.


            यावेळी ते म्हणाले की, जीवनाच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष पाहिला. त्यानंतर जी वाटचाल झाली, त्यातून सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावले. कधी सत्ताधारी म्हणून, तर कधी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले. या पदावर असताना ती जबाबदारी अधिक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे यावेळी त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर विधानसभा सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, नाना पटोले आदींची भाषणे झाली. सर्वांनी या निवडीबद्दल श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

सहकार विभागातील रिक्तपदांची लवकरच भरतीप्रक्रिया

 सहकार विभागातील रिक्तपदांची लवकरच भरतीप्रक्रिया


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 3 : राज्यातील सर्वच विभागातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. सहकार विभागातील रिक्त पदे लवकर भरण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            नाशिक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांना लाच घेताना अटक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या प्रकरणांमध्ये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. सहकार विभागाचे काम अधिक गतीने आणि


            सुसूत्रतेत चालण्यासाठी ठरलेल्या मुदतीत सर्व पदे भरण्यात येतील. संपूर्ण पारदर्शीपणे भरती केली जात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


००००



Featured post

Lakshvedhi