Thursday, 2 March 2023

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फेअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फेअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 1 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अर्ज स्विकृती कार्यालयीन वेळेत करण्यात येईल, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


        चर्मकार समाजांतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.


       अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. यात जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा).,अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र-आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन).,व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), वीजबिल, टॅक्स पावती इ, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.


            कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, गव्हर्नमेंट लेदर वर्किंर्ग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 या ठिकाणी स्विकारले जातील. मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.


000


कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती.

 कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती.

            मुंबई, दि. १ : कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरल्या जाणार आहेत.


            या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन २, फिटर (जोडारी) २, इन्फरमेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेन्टेनन्स १, यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलीकरण २, कातारी (टर्नर) ४, इन्स्ट्रूमेंट मॅकॅनिक १ इतक्या रिक्त जागा तासिका तत्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली असून संबंधित व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, एनसीव्हीटीचे प्रमाणपत्र, एटीएस उत्तीर्ण व दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


            इच्छुक उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्राच्या प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.


०००००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

            मुंबई, दि. 1 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सदस्य डॉ. पांढरपट्टे यांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप रा. दिघावकर, सचिव डॉ. सुवर्णा सिद्धार्थ खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते. आयोगाचे अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी सदस्य डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत करून परिचय करून दिला.


            डॉ. पांढरपट्टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत.त्यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनसह कोकणात सेवा बजावली आहे. सन २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाली. सन २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. डॉ. पांढरपट्टे यांनी प्रशासकीय सेवेत राहून साहित्यिक सेवा बजावली आहे. त्यांनी उर्दू भाषेचे ज्ञान आत्मसात केले आहे. ‘गझल’ हा त्यांचा आवडता काव्य प्रकार आहे. त्यांची विविध विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.


0000 

ये जिवन हैं, इसी जिवन का याही हैं






 

Wednesday, 1 March 2023

शेतकरी, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात प्रशिक्षण देणार

 शेतकरी, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात प्रशिक्षण देणार

- कृषीमंत्री अब्दुल सत्तार 

            मुंबई, दिनांक 28 : शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रासोबत सेंद्रिय शेती आणि प्रगत शेती या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी डाबर, टाफे कंपनी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात करार करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.


            मंत्री श्री. सत्तार यांनी आज मंत्रालयात डाबर आणि टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रमणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, टाफे कंपनीचे टी. आर. केशवन, वरिष्ठ संशोधक डॉ. लक्ष्मण सावंत, डॉ. उदय खोडके, डॉ. डी. आर. कदम आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री.सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटाच्या काळात मदत करून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आज टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात कंपनीतर्फे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी करार करण्यासंदर्भात चर्चा झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यातील हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास नक्की मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आयुर्वेदिक वनस्पतींचे करणार संगोपन


             आयुर्वेदात महत्त्व असणाऱ्या अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सापडणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतींचे संगोपन करण्यासंदर्भात डाबर कंपनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पूरक जोडधंदा उपलब्ध होईल, असेही मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.


000

२० बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे

 -२० बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे

- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव.

ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या २८ ते ३० मार्च दरम्यान बैठका.

            मुंबई, दि. २८ : जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठका २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.


            जी २० परिषदेच्या ‘ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुप’ च्या बैठकांच्या तयारीबाबत आज बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एल. सत्यनारायण सत्यमूर्ती, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव डॉ. कृष्णन कुमार आदी उपस्थित होते.


            बैठकीत सुरवातीला सहसचिव डॉ कुमार यांनी मुंबईत होणाऱ्या बैठकांबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी बैठका होणारी ठिकाणे, शिष्टमंडळात येणारे प्रतिनिधी, त्यांची निवासाची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था याबाबत माहिती दिली.


            शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे विमानतळावरील आगमन ते परत जाण्यापर्यंत अतिशय नेटके नियोजन करावे. निवास व्यवस्था, निवास व्यवस्थेशेजारी वैद्यकीय व्यवस्था करण्यात यावी. निवास व्यवस्था ते बैठकांचे ठिकाण या दरम्यानच्या मार्गावर मुंबई आणि राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर आधारित माहिती फलक लावावेत, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.


            निवास व्यवस्थेच्या ठिकाणी पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने स्टॉल उभे करावेत. यामध्ये महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, हस्तकला यांची माहिती देणारे स्टॉल असावेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मदत घेण्यात यावी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करावे, यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक कलांबरोबरच देशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन होईल, अशा अनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            बैठकीस राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिव आनंद भास्कर आदी उपस्थित होते.



रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु

 रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु


                                          - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.


          विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरु असून यामध्ये पोलीस उप अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली 16 जणांची एसआयटी टीम नेमली आहे. या प्रकरणाचा लवकरच तपास पूर्ण होईल.


          पत्रकार बांधवांवर हल्ला ही बाब गंभीर आहे. राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे. परंतु कडक कार्यवाहीबाबत आवश्यक असेल तर या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. या तपास प्रकरणात कोणताही हस्तक्षेत नाही किंवा पोलीसांवर दबाव नाही. यामध्ये पोलिस महासंचालक यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात येतील. राज्य शासनाकडून या पत्रकाराच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


          रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार असून सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असणार आहे. यामध्ये 3 कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या हितासाठी हा प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

Featured post

Lakshvedhi