Wednesday, 7 December 2022

वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य

 वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त.

            मुंबई, दि. 6 : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.


            गुजरात येथून आणलेल्या सिंहांची जोडी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. वनग्रंथालयाचे भूमीपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटनही श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश वाघ, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, सतीश वाघ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, क्लामेंन्ट बेन उपस्थित होते.


            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, "संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे कौतुक आहे. वनांचे काम मनापासून करा, हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे, वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमीका निभावली, त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळूया. संजय गांधी उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे, ते देखील आपण जपूया असे ते म्हणाले.


            खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कामात सातत्य कायम ठेवले. सिंहाच्या अधिवासामुळे बोरीवली येथील जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात श्री. मुनगंटीवार यांनी भर घातली. या उद्यानाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. येत्या काळात राज्याचा वनविभाग उत्कृष्ट प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


            आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘वन ग्रंथालय’ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात भर घालेल.


उद्यान व्हावे ज्ञानाचे केंद्र


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेन चालवण्यात येते. ही ट्रेन केवळ पर्यटन आणि मनोरंजनापुरती मर्यादित राहू नये, तर ती ज्ञानदानाचे केंद्र बनावी, अशी अपेक्षा वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात अलीकडेच 'टॉकिंग ट्री'चा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे असेच आधुनिक उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबविले जावे, असे ते म्हणाले.


००००

राज्याला उद्योग क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यात

 राज्याला उद्योग क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यात

अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य मोलाचे ठरेल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई दि 6 :- महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेच. शिवाय अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. या पुढील काळातही राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य मोलाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            वांद्रेतील जियो कन्व्हेन्शन सेंटर येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स ('AMCHAM')चे ॲपेक्स कॉन्क्लेव्ह झाले. यावेळी राजदूत एलिझाबेथ जोन्स, राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष संजय कौल, पश्चिम विभागीय अध्यक्ष सार्थक रानडे, उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना खन्ना व अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. गती शक्ती योजनेमुळे मोठे बदल घडणार असून याव्दारे उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.


महाराष्ट्र स्टार्ट अप्स व युनिकॉर्नची राजधानी


            महाराष्ट्र राज्य आता नावीन्यतेची, स्टार्ट अप्स व युनिकॉर्नची राजधानी बनली आहे. पायाभूत सुविधा, नावीन्यता आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. ‘स्पीड ऑफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड ऑफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.


समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल


            समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या महामार्गामुळे 14 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नागपूर आता 'जेएनपीटी'शी 10 तासात जोडले जात आहे. आता हा महामार्ग सेमीफास्ट रेल्वे आणि कार्गो रेल्वेनेही जोडला जाणार असून या महामार्गामुळे डेटा सेंटर इको सिस्टीम आता उर्वरित राज्यातही उभी राहणार आहे.


            10 हजार गावांमध्ये अॅग्री बिझनेस सोसायटी उभारण्यात येणार असून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जात आहे.


राज्यात हरित ऊर्जा वापराला चालना


            पर्यायी इंधन क्षेत्रातही राज्य अग्रेसर असून राज्यात हरित ऊर्जेला अधिक चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सौर व पवन ऊर्जेला तसेच एलएनजी व कोल गॅसिफिकेशनला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत असून याव्दारे शेतकऱ्यांना दिवसाही शेतीसाठी वीज उपलब्ध राहणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.


            राजदूत एलिझाबेथ जोन्स म्हणाल्या, भारत हा अमेरिकेचा महत्त्वपूर्ण सहकारी आहे. भारत देश सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून जागतिक स्तरावर भारतासाठी विविध क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. भारतातील उद्योगांशी दीर्घकालीन सहकार्य करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही जोन्स यांनी सांगितले.

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका;

 फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका;

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल

 

            मुंबईदि. :  पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

            या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

            पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली.  बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारेनगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीपुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमारपुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेफुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्पयोजनांमध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

            या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल, असे सांगितले.

            पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.

00000


 

राहाल जामीन कोणाला?

 


कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार

 कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार





- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 6 : “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.


            कोकण भूमी प्रतिष्ठानच्या 'मी मुंबई अभियान' अंतर्गत 'स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा'चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.


            निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.”


            लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार - उपमुख्यमंत्री फडणवीस


            कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


           “कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून श्री.फडणवीस म्हणाले, “बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे” हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


            काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.


            प्रारंभी महोत्सवाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर तसेच स्वागताध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


00000





महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

 महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. गुजराती भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी विविध पुरस्कारासह पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

 महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,


पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे सिंधी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सिंधी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावरील नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.


०००००




Featured post

Lakshvedhi