Thursday, 30 June 2022

नामकरण

 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव

करण्याबाबत मान्यता

            औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

-----०-----

नगर विकास विभाग

नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण

लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

            नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----०-----


 

Wednesday, 29 June 2022

 सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

- अपर मुख्य सचिव नितिन गद्रे

            मुंबई दि. 29 :- सर्व क्षेत्रात सांख्यिकी अपरिहार्य आहे. राज्यासाठी विविध योजना तयार करताना सांख्यिकीचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. शाश्वत विकासासाठी सांख्यिकी संकल्पनेस अनुसरून अचूक, विश्वासार्ह, वेळेत आकडेवारी प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी व्यक्त केले.

            अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खादी व ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा, कामगार आयुक्त सुरेश जाधव, संचालनालयाच्या उपमहानिदेशक सुप्रिया रॉय, संचालक विजय अहेर यांसह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            श्री. नितिन गद्रे म्हणाले, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ ही आहे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचे मुख्य स्त्रोत सांख्यिकी असते. त्यामुळे अचूक माहितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील स्त्रोतांचा अभ्यास करून नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करण्यात येते. यामध्ये सांख्यिकी विभागाची भूमिका महत्त्वाची असते. कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी संकटाला न घाबरता जबाबदारी पार पाडली.

            यावेळी श्री.गद्रे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कौशल्याचा वापर करुन विशेष, नियोजनबद्ध कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सांख्यिकी संचालनालयामार्फत विविध सांख्यिकी अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

०००

ग्रामपंचायत निवडणूक

 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

            मुंबई, दि. 29 (रानिआ) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. 

            श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.


            विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6. धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6. अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3. पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2. सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4. सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1. सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2. बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5. लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4. उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3. एकूण- 271.       


-0-0-0-



 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

            मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जुलै २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण / पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान, महापालिका शाळा क्र.२, चिराग नगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पारशीवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांचेवतीने करण्यात आले आहे.


00000



 प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी

27 चित्रपटांना 8 कोटी 65 लाख रुपये

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख .

            मुंबई, दि. 29 : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण 23 चित्रपटांसाठी तसेच 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर 2 चित्रपट अशा एकूण 27 चित्रपटांकरिता प्राथमिक टप्प्यात 8 कोटी 65 लाख रुपये इतक्या रकमेचे अनुदान संबंधित निर्माते/ निर्मितीसंस्था यांना धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी दिली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे मराठी चित्रपट निर्मात्यांना देण्यात येणारे अनुदानाचे वाटप याबाबतचा विषय महामंडळाच्या संचालक बैठकीत घेण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी संबंधितांना अनुदान वाटपासंदर्भातील सूचना दिल्या. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत महामंडळाकडे अर्थसहाय्यासाठी प्राप्त झालेल्या चित्रपटांपैकी 55 चित्रपटांचे परिक्षण 5 जानेवारी 2022 ते 8 जानेवारी 2022 या काळात, 10 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2022 आणि 17 जानेवारी 2022 ते 21 जानेवारी 2022 या काळात शासनाने गठित केलेल्या चित्रपट परिक्षण समितीकडून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी मुंबई येथे करण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार "अ" दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता 40 लाख रुपये इतके अनुदान आणि "ब" दर्जा प्राप्त चित्रपटांकरता 30 लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना 71 च्या पुढे गुण असतील त्यांना "अ" दर्जा व 51 ते 70 गुण असणाऱ्या चित्रपटांना "ब" दर्जा देण्यात येतो. ज्या चित्रपटाला 51 पेक्षा कमी गुण मिळतील तो चित्रपट अपात्र असेल व त्यास कोणतेही अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार नाही असे निकष ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार / आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परिक्षणाशिवाय आपोआपच "अ" दर्जा बहाल होतो मात्र चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता होत असल्यास त्यास "अ" दर्जा प्रमाणे अर्थसहाय्य लागू होते.

            27 नोव्हेंबर 1997 च्या शासन निर्णयानुसार दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या मूळ शासन निर्णयामध्ये 30 ऑक्टोबर 2013 आणि 8 ऑगस्ट 2018 अन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 30 ऑक्टोबर 2013 आणि 3 मे 2013 रोजी किंवा त्यानंतरच्या दिनांकास जे मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्ड प्रमाणीत होतील अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक हजार रुपये किंवा वेळोवेळी शासन निश्चित करेल एवढे शुल्क जमा केल्यानंतर अर्थसहाय्याचा विहीत नमुन्यातील अर्ज महामंडळाकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. 3 मे 2013 पूर्वी सेन्सॉर बोर्ड प्रमाणित होणारे मराठी चित्रपट जुन्या योजनेप्रमाणे म्हणजे 11 ऑक्टोबर 2005 अन्वये पात्र राहतील.


                                           

मतदार यादी

 महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. 29 (रानिआ) : विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

            बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ‘ट्रू-व्होटर’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

            महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ‘ट्रू- व्होटर’ मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी ‘व्होटर लीस्ट ऑबजेक्शन’ यावर क्लिक करून ‘व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.

            विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

-0-0-0-



तेथे कर माझे जुळती

 " येथे कर आमुचे जुळती ". जेव्हा डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी कुन्नूरला भेट दिली होती. तेथे पोचल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की, फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅ हे येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये भरती आहेत. राष्ट्रपतींच्या त्यादिवशीच्या शासकीय अधिकृत दिनचर्येमध्ये सामाविष्ट नसतानाही डॉक्टर अब्दुल कलामांनी सॅम यांची भेट घेण्याचे ठरवले. तशी ताबडतोब व्यवस्थाही करण्यात आली. सॅम यांच्या रुग्णालयातील बेड शेजारी कलामांनी पंधरा मिनिट बसून सॅम यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निघताना कलामांनी त्यांना विचारले की, आपण व्यवस्थित आहात का? आपणास कशाची आवश्यकता आहे का? आपली काही तक्रार आहे का? मी आपणास काही मदत करू शकतो का? यावर सॅम म्हणाले, 'हो महामहिम, माझी एक तक्रार आहे'. कलामांना हे ऐकून धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ विचारले, कोणती तक्रार आहे? सॅम म्हणाले, 'सर मी उठून उभा राहू शकत नाही आणि माझ्या प्राणप्रिय देशाच्या आदरणीय राष्ट्रपतींना मी सॅल्युट करू शकत नाही हीच माझी एकमेव तक्रार आहे.' कलामांनी भावनावेगाने त्यांचे दोन्ही तळवे हातात घेतले आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळून गेले. या भेटीच्या दरम्यान कलामांना माहिती मिळाली की सॅम यांना फिल्डमार्शल या या पदाची गेल्या वीस वर्षापासून पेन्शन मिळालेली नाही. कलामांनी दिल्लीला पोचल्याबरोबर एका आठवड्यात त्यांची सर्व थकबाकी सह पेन्शन मंजूर केली आणि 1.25 कोटीचा चेक त्यांनी संरक्षण खात्याच्या सचिवांमार्फत विशेष विमानाने वेलिंग्टन,ऊटी येथे पाठवला. त्यावेळेस तेथे सॅम उपचार घेत होते. हे कलामांचं मोठेपण होतं. पण नंतर सॅम यांनी त्या चेक ची रक्कम आर्मी रिलीफ फंडामध्ये दान केली. आपण नतमस्तक कुणासमोर व्हायचे? दोघेही महानच आहेत 🌼🌼🌼

Featured post

Lakshvedhi