Tuesday, 12 April 2022

 पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे 12 एप्रिल रोजी आयोजन

            मुंबई, दि. 11 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे.

            ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना यासारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.

            या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

००००

देश विदेशातून वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार

विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 11 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले.

            मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्याना विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरीकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

            विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबट्या सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

0000000



 



 केवळ 75 नालेसफाई जूनपर्यंत करायची हा एक मोठा घोळ असून त्याचा तपास घेणार...

नालेसफाई नीट होण्याकरिता मुंबई भाजपा दक्षता समिती स्थापन करणार

– आ. अतुल भातखळकर यांची घोषणा

मुंबईदि. 11 एप्रिल (प्रतिनिधी)

            मुळातच उशिरा काढलेल्या नालेसफाईच्या कंत्राटामध्ये पावसाळ्यापर्यंत अवघे 75 % नालेसफाई करायची असा नियम घालून मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या तुंबण्याची व्यवस्था केली आहे असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज सकाळी नालेसफाई पाहणी नंतर बोलताना केला.

            कांदिवली पूर्व येथील पोयसर व अन्य नाल्यांचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले की केवळ 75 % नालेसफाई जूनपर्यंत करायची आणि उरलेली नालेसफाई डिसेंबरपर्यंत करायची अशी तरतूद या कंत्राटमध्ये करण्यात आल्यामुळे यावेळी सुद्धा मुंबई पुन्हा एकदा बुडणार असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  मुळातच नालेसफाईची निविदा एक महिना उशिरा काढली, त्याचबरोबर निविदा उशिरा काढत असताना मुंबई शहरातल्या सर्व नाल्यांचे कंत्राट न करता, टप्प्याटप्प्याने कंत्राट काढण्याचा प्रयत्न केला गेला याचाच अर्थ या सगळ्या कंत्राटामध्ये मोठा घोळ असून याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले.

            महानगरपालिका बरखास्त झाल्यामुळे आणि दरवर्षी नालेसफाईच्या कामात होत असलेल्या घोटाळ्यामुळे मुंबई भारतीय जनता पार्टी प्रत्येक नाल्याची तपासणी करण्याकरिता व नालेसफाई नीट होण्याकरता त्या त्या विभागातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजातील मान्यवर यांची एक दक्षता पथक स्थापन करणार असल्याची घोषणा सुद्धा आ. अतुल भातखळकर यावेळी यांनी यावेळी बोलताना केली.

            नालेसफाई तातडीने करण्याकरिता ज्यांना कंत्राट मिळाले आहे त्यांना अधिक यंत्रसामुग्री देण्यात यावीतसेच हे काम अत्यंत गतिमान पद्धतीने करावे असे मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांना भेटून सांगणार असल्याचे आ. अतुल भातखळकर यांनी म्हटले.


 मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत

यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान

            मुंबई, दि. 11 : महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता सह्याद्री शासकीय अतिथिगृह,मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

            या कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, माविमच्या व्‍यवस्‍थापकीय संचालक, श्रीमती श्रद्धा जोशी या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिला सुरक्षा ऑडीट प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण होणार आहे, त्याचप्रमाणे पहिल्या सत्रात महिला सुरक्षा ऑडिट प्रशिक्षण व दुसऱ्या सत्रात राज्यातील यशस्वी महिला उद्योजक/ सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यक्रम व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे

 

रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदी  

नोंदणी मुदत 30 एप्रिलपर्यंत

 

        मुंबईदि. 11 : पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

          राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे ते 30 जून, 2022 असा कालावधी निश्चित केला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती अन्ननागरी पुरवठाग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.                                      

Featured post

Lakshvedhi